अन्नरसांचा प्रकृतीवर उत्तम परिणाम होण्यासाठी नामजप करत जेवणे श्रेयस्कर !

२८ एप्रिल २०२१ या दिवशी प.प. भगवान श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात. आपणास इतर काही साध्य झाले नाही, तर जेवणास बसण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून नामस्मरण करत वायफळ न बोलता, वाईट न ऐकता, ध्यानातच मन ठेवून अथवा पवित्र अध्यात्म विचार करत जेवणे काही अशक्य नाही.

जेवतांना म्हणायचा श्‍लोक

जेवतांना पवित्र भावना असावी; म्हणूनच उत्तम श्‍लोक म्हणण्याची प्रथा पूर्वजांनी घालून दिली आहे. श्रीसमर्थांनी श्रीहरि पावण्याचा एक सुगम उपाय सांगितला आहे.’

‘‘जनी भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्य घोषें म्हणावे ॥
हरिचिंतने अन्न जेवित जावे । तरी श्रीहरि पाविजेतो स्वभावे ॥

– प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक, ‘श्रीधर संदेश’, जुलै १९८८)