‘कोकण हापूस’ या नावाने अन्य आंब्यांची विक्री करून फसवणूक करणार्‍यांवर कारवाई होणार !

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश !

वैभव नाईक

मुंबई – आंब्याची ज्या राज्यातून आणि ज्या नावाने आवक होईल, त्याच नावाने त्याची विक्री करावी. परराज्यातून आलेला आंबा त्या राज्याच्या आणि आंब्याच्या तेथील जातीच्या नावाने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. ‘इतर जातीचा आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांची फसवणूक होत आहे’, असे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कृषीमंत्री भुसे यांना त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍याच्या वेळी निदर्शनास आणून दिले होते, तसेच कृषीमंत्री भुसे यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याही ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.

कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर पणनमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांनी १२ एप्रिल २०२१ या दिवशी परिपत्रक जारी केले आहे. ‘याविषयीची दक्षता घेण्यात यावी आणि अशा प्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास आणि विनियमन) अधिनियम १९६३ चे नियम १९६७ आणि त्याखालील उपविधीतील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.