कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे वेळेत अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

ससून रुग्णालयात १ दिवसात ३० कोरोनाबाधितांचा मृत्यू

पुणे – येथील ससून रुग्णालयात १२ एप्रिलच्या पहाटे ३ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एका रुग्णालयातील केवळ १२ घंट्यांच्या कालावधीतील ही आतापर्यंतची धक्कादायक घटना आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पहाटेपासून नातेवाइकांच्या रांगा लागलेल्या होत्या. रुग्णालयात व्हेंटिलेटरच उपलब्ध नाहीत. त्यांचा साठा संपलेला आहे. तसेच ऑक्सिजनचीही कमतरता भासत आहे. या सर्वांच्या जोडीला रेमिडेसिविर इंजेक्शनही उपलब्ध नाही.

भारताची रुग्णांच्या संदर्भातील केविलवाणी दशा !

कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना रुग्णांना प्रशासन आणि रुग्णालय यांच्याविषयी येणारे वाईट अनुभव संबंधितांना लज्जास्पद आहेत. या लेखावरून ‘शत्रूराष्ट्राच्या नियंत्रणाखाली असलेल्या राष्ट्रापेक्षा भारताची रुग्णांच्या संदर्भात किती केविलवाणी दशा आहे’, हेच दिसून येते. हलगर्जीपणा करणार्‍या आणि दायित्वशून्य प्रशासनाकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि केला जाणारा हलगर्जीपणा हिंदु राष्ट्रात (ईश्‍वरी राज्यात) नसेल, तर प्रत्येक रुग्णाची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेण्यात येईल. या लेखात दिल्याप्रमाणे कुणाला असे वाईट अनुभव आल्यास ते नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा ! – संपादक  

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

साधकांसाठी सूचना, तसेच वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती

सध्या कोरोना महामारीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी भरती होणार्‍या रुग्णांची संख्याही अधिक आहे. जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जात आहेत, त्यांना अनेक कटू अनुभवही येत आहेत, उदा. तपासणीसाठी नमुने घेतांना ते योग्य प्रमाणात न घेतल्याने रुग्णांना पुन्हा नमुने देण्यासाठी धावपळ करावी लागणे, तपासणी अहवाल वेळेत न देणे, तपासणी अहवालाचा सविस्तर तपशील न देणे, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णाला उपचारांसाठी भरती करून घेण्यास नकार देणे; मात्र प्रतिष्ठित व्यक्तीने दूरभाष केल्यावर रुग्णाला भरती करून घेऊन व्हेंटिलेटरवर ठेवणे, शासकीय रुग्णालयांत विनामूल्य मिळणारे इंजेक्शन उपलब्ध नसणे, त्यामुळे बाहेरून सहस्रो रुपयांचे इंजेक्शन विकत आणायला लावणे, औषधांचा अवैध साठा करून काळा बाजार करणे, अहवाल प्राप्त नसल्याचे कारण सांगून मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात न देणे, मृतदेह कह्यात देतांना रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल होणे, कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागा उपलब्ध न होणे इत्यादी.

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]