पंजाबमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी भाजपच्या आमदाराला मारहाण करत कपडे फाडले !

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असून तेथे एका पक्षाच्या आमदाराला अशा प्रकारे मारहाण होते, हे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक आहे. शेतकरी आंदोलन आता समाजविघातक घटकांच्या कह्यात गेले असून त्यांच्याकडून अशी कृती होत आहे, हे लक्षात घ्या !

पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा

चंडीगड – पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे भाजपचे आमदार अरुण नारंग यांना कृषी कायद्याचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या एका गटाने मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले. अरुण नारंग हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे गेले होते. शेतकर्‍यांनी त्याला विरोध केला. शेतकर्‍यांच्या माराहाणीच्या वेळी पोलिसांनी नारंग यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या मारहाणीचा निषेध केला आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची चेतावणी दिली. परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे सूत्र लवकर सोडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शनपाल यांनी सांगितले की, भाजप आमदाराला झालेली मारहाण अतिशय खेदजनक आहे. अशा घटनांचे आम्ही समर्थन करत नाही. या घटनेचा निषेध करतो.