परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती  

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. कु. मनीषा माहुर

१ अ. भावसोहळ्याच्या दिवशी सकाळपासून सेवाकेंद्रातील वीजपुरवठा खंडित होणे आणि संतांनी नामजपादी उपाय केल्यावर वीजपुरवठा चालू होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता येणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या भावसोहळ्याच्या दिवशी देहली सेवाकेंद्रात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर संतांंना ही अडचण सांगितल्यावर त्यांनी नामजपादी उपाय केले आणि सेवाकेंद्रातही उपाय केल्यावर वीजपुरवठा त्वरित चालू झाला. त्या दिवशी दुपारी १.४५ वाजता वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. कार्यक्रम दुपारी २ वाजता चालू होणार होता. संतांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी पुन्हा नामजपादी उपाय केले आणि ठीक २ वाजता वीजपुरवठा चालू झाला. ईश्‍वराच्या कृपेने आम्ही संपूर्ण भावसोहळा निर्विघ्नपणे पाहू शकलो.

१ आ. भावसोहळ्याच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासाठी किती करतात !’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.

२. सौ. सुनंदा चौधरी

२ अ. झालेले त्रास – कंबर, पाय आणि पोट पुष्कळ दुखणे : भावसोहळ्याच्या आरंभी मी ‘मला या कार्यक्रमाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना केली. तेव्हा थोड्या वेळाने माझ्या घशाला कोरड पडून तहान लागली. मी एक पेला पाणी प्यायले. त्यानंतर माझी कंबर, पाय आणि पोट पुष्कळ दुखायला लागले. आतून लचके तोडल्यासारखे माझे पोट दुखत होते, तरीही दुखण्याकडे लक्ष न देता मला शांतपणे भावसोहळा बघता आला.

२ आ. चांगल्या अनुभूती – परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून श्रीविष्णुरूपात दर्शन झाल्यावर ग्लानी जाऊन हलकेपणा वाटणे : मला भावसोहळ्याच्या शेवटी ग्लानी आली. तेव्हा मी डोळे मिटून केवळ ऐकत होते. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून श्रीविष्णुरूपात दर्शन झाले. नंतर माझी ग्लानी जाऊन मला हलकेपणा जाणवला आणि शांत वाटले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझे सर्व त्रास नाहीसे झाले.

३. सौ. केतकी येळेगावकर

सोहळ्याच्या दिवशी देवापुढे लावलेले दिवे भावसोहळा संपेपर्यंत शांतपणे तेवत होते. दिव्यांच्या वाती स्थिर होत्या. कार्यक्रम संपताच वाती फडफडू लागल्या.

श्री. प्रणव मणेेरीकर यांना साधनेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे

१. ‘आपण गुरुऋण कधीच फेडू शकत नाही; मात्र गुरूंनी सांगितल्यानुसार साधना करून आपला उद्धार करून घेऊ शकतो.

२. ईश्‍वर जसे सर्वांचे दायित्व घेतो, तसे आपल्याला आपली सेवा आणि सहसाधक यांचे दायित्व घ्यायला हवेे.

३. प्रत्येक कर्म करण्यापूर्वी प्रार्थना आणि कर्म केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केल्यावर आपण कर्मबंधनातून मुक्त होतो.

४. ‘संत ज्ञानेश्‍वरांनी ज्या प्रकारे रेड्याकडून वेद वदवून घेतले, तसे माझे गुरुसुद्धा माझ्याकडून साधना करून घेतील’, अशी श्रद्धा हवी.’

– श्री. प्रणव मणेरीकर, देहली सेवाकेंद्र

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक