जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

नवी देहली –आयक्यूएअर’ या स्विस संघटनेने घोषित केलेल्या अहवालानुसार जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असून त्यांत ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी’मध्ये देहली शहराचा समावेश आहे. वर्ष २०१९ ते २०२० या कालावधीत हवेच्या गुणवत्तेत १५ टक्क्यांनी सुधारणा झाली असली, तरी देहली १० व्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे, असे यात म्हटले आहे. गझियाबाद हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

१. देहलीसह उत्तरप्रदेशातील गझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लक्ष्मणपुरी, मेरठ, आगरा आणि मुझफ्फरनगर; राजस्थानातील भिवारी; हरियाणातील फरीदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धरूहेरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूर ही अन्य २१ शहरे प्रदूषित आहेत.

२. भारतामध्ये हवेचे प्रदूषण प्रामुख्याने वाहतूक, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास, वीजनिर्मिती, उद्योग, बांधकाम आणि कचरा जाळणे यामुळे होत आहे.