नागपूर येथे २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ६४४ नवीन रुग्ण !

कोरोना नियम न पाळल्यास टाळेबंदी करू ! – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची चेतावणी

प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर – जिल्ह्यात २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर ६४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या धोकादायक काळातही नागरिकांनी नियम न पाळल्यास जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात येईल, अशी चेतावणी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली आहे.

विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळत आहेत. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांना चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचावे, असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ३० ते ४० वयोगटांतील असून रुग्ण वाढण्याला ‘मास्क’ न घालणे, शारीरिक अंतर न ठेवण्यासह बिनधास्त फिरणे हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, शिकवणी वर्ग, मॉल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणार्‍यांवर कारवाई केली जाईल. कोरोना नियंत्रणासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही.