छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी भूमी !

छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ पत्रांतून ते साधू-संतांचा योग्य सन्मान करायचे, हे पुन्हा एकदा सिद्ध !

छत्रपती शिवाजी महाराज हे साधू-संतांचे आदर करायचे, तर आजचे राजकारणी हिंदु संतांवर टीका-टिप्पणी करतात किंवा प्रसंगी शंकराचार्य यांच्यासारख्या हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना काहीही कारण नसतांना कारागृहात डांबतात ! हिंदु राष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे साधू-संतांचा आदर करणारे राजे असतील !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज साधू-संतांचा योग्य सन्मान करायचे, याविषयीचा पुरावा समेार आला आहे. छत्रपती शिवरायांनी चिंचवडचे महासाधू श्री मोरया गोसावी यांना बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावात १ चावर जमीन (आजच्या काळातील अनुमाने ९२ एकर जमीन) इनाम दिली होती. त्या इनामाच्या संदर्भात माळेगाव बु. (ता. बारामती) येथील मोडी अभ्यासक आणि इतिहास संशोधक अधिवक्ता ओंकार उदय चावरे यांना पुणे पुराभिलेखागार येथील दफ्तरात मोडी लिपीतील २ अप्रकाशित आणि दुर्मिळ पत्रे सापडली. ही दोन्ही पत्रे शिवाजी महाराजांनी लोणी भापकर या गावच्या अधिकार्‍यांना लिहिली होती.

चिंचवडचे महासाधू श्री मोरया गोसावी

१. शिवकाळातील सुपे परगण्यातील लोणी बाराऊ कर्डीयाची म्हणजेच आजच्या बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव वर्ष १६४५-४६ मध्ये शहाजी महाराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वैयक्तिक व्ययासाठी मिळाले होते.

२. त्याच काळात शिवाजी महाराजांनी महासाधू मोरया गोसावी यांना गावातील १ चावर भूमी धर्मकार्यासाठी दिली होती.

३. जमिनीची मोजणी होऊन हद्द निश्‍चित झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी लोणीच्या हुद्देदार आणि मुकादम यांना ३० सप्टेंबर १६४६ या दिवशी हे पहिले पत्र लिहिले, असे चावरे यांनी सांगितले.

दुसरे पत्र वर्ष १६४६ मधील आहे. या लोणी गावातील पिकांवर लावलेल्या करांपैकी काही विशिष्ट भाग हा गला राजहिसा म्हणजे धान्य स्वरूपातील राजाचा हिस्सा म्हणून कररूपाने वसूल होत असे; मात्र मोरया गोसावींच्या इनाम जमिनीवरील तो करही छत्रपती शिवाजी महाराजांनी माफ करून तसे लोणी भापकर गावच्या हुद्देदार आणि मुकादम यांना हे पत्र लिहिले होते.

या पत्रात महाराज तेथील अधिकार्‍यांना ताकीद देतात की, यापुढे एक जरायासी तसवीस न देणे म्हणजे यापुढे मोरया गोसावींना कणभरही त्रास होऊ देऊ नका, अशी माहिती चावरे यांनी दिली. ही पत्रे महाराजांच्या कारकीर्दीच्या आरंभीच्या काळातील असल्याने त्यांची लहान वयातही असणारी प्रगल्भता दिसून येते, तसेच स्वराज्यातील साधूसंतांचा त्यांनी कायम आदर केला, याचे आणखी एक उदाहरण या पत्राद्वारे समोर आले आहे, असे चावरे यांनी नमूद केले आहे.

पत्रातील मुख्य वैशिष्ट्ये

१. छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पत्र दिले होते.
२. पत्राची लिपी मोडी असून मायना अजरख्तखाने या फारसी स्वरूपाचा आहे.
३. पत्रात संबंधित इनामाच्या तत्कालीन थळांचा म्हणजे ठिकाणांचा उल्लेख आहे.
४. या इनामापैकी एक चतुर्थांश भाग खासा मिरासीपैकी म्हणजे खुद्द महाराजांच्या वैयक्तिक बाबीतून दिला होता.
५. राजाच्या खाजगी उत्पन्नात जमा होणारा धान्य स्वरूपाचा करही महाराजांनी मोरया गोसावींना माफ केला होता.