नागपूर येथे दादागिरी करणार्‍या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या !

नागपूर येथील गुंडांवर कठोर कारवाई करण्यात अकार्यक्षम ठरलेली पोलीस यंत्रणा !

नागपूर – शहरातील नारायण पेठ परिसरात गुंड विजय वागधरे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त लोकांनी त्याची ७ फेब्रुवारीच्या रात्री दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना कह्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध चालू आहे. (पोलिसांनी गुंड विजय याच्यावर आतापर्यंत कठोर कारवाई न केल्यामुळे तो इतरांशी सतत वाद घालून लोकांना त्रास देत होता. पोलिसांनी गुंडावर कठोर कारवाई न केल्यानेच लोकांचा पोलिसांवरील विश्‍वास न्यून होतो आणि ते कायदा हातात घेऊन हिंसक कृती करतात. – संपादक)

सुनील नावाच्या व्यक्तीसमवेत गुंड विजय याने ७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी वाद घातला. त्यामुळे सुनील आणि त्याचे भाऊ हे विजय याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले होते; मात्र पोलीस ठाण्याचे कर्मचारी एका कार्यक्रमाच्या बंदोबस्तात तैनात असल्याने पोलिसांनी विजय याच्यावर कारवाई केली नाही. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा गुंड विजय याने सुनील याच्या घरासमोर गोंधळ घालायला प्रारंभ केला. या कारणावरून सुनील आणि विजय यांच्यात पुन्हा वाद झाला, तेव्हा नारायण पेठ परिसरातील संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत विजय याचा मृत्यू झाला.