कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस १ फेब्रुवारीपासून चालू ! – संजीव मित्तल

कोल्हापूर – कोरोनाकाळात बंद केलेली कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे गाडी येत्या १ फेब्रुवारीपासून चालू करण्यात येईल. कोल्हापूर- वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात चालू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी व्हर्च्युल (आभासी) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी मित्तल म्हणाले

१. निधीअभावी हे काम पुढे काम होऊ शकले नाही. अशीच अन्य तांत्रिक कामे निधी अभावी अपूर्ण आहेत. ती येत्या वर्षभरात चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

२. आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू चालू करत आहोत.

३. रेल्वेने माल वाहतूक सेवा चालू आहे. यात कोल्हापूर-सांगलीतून शेतीमाल वाहतूक होते. त्यासाठी ‘कोल्डस्टोरेज’ची व्यवस्थाही अपेक्षित आहे; मात्र विभागीय स्तरावर मागणी झाल्यास माल वाहतूक वाढण्याची निश्चिती असल्यास तशी व्यवस्था करण्याविषयी विचार केला जाईल.