मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

पू. अधिवक्ता हरिशंकर जैन (डावीकडे) यांना सनातन पंचाग भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

नवी देहली – मकरसंक्रतीच्या निमित्ताने १४ जानेवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांना सनातन पंचाग आणि प्रसाद दिला, तसेच दळणवळण पुन्हा समितीचा धर्मप्रसार चालू झाल्याची माहिती दिली. यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला.

तुमचे येणे हाच आमच्यासाठी सण ! – अधिवक्ता आर्. वेंकटरमणी

‘तुम्हाला भेटून आनंद होत आहे’, असे सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी म्हटल्यावर अधिवक्ता वेंकटरमणी म्हणाले, ‘‘तुमचे येणेच आम्हाला एका सणासारखे आहे. आज आपली भेट होणे हे माझे भाग्य आहे.’’ सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी त्यांना भेट आणि प्रसाद दिल्यावर अधिवक्ता यांनी तो डोळ्यांना लावला आणि म्हणाले, ‘‘तुमच्या हातांतून मिळतोे, तो प्रसादच आहे.’’

हिंदु धर्माविषयीचे खटले लढतांना देव स्वप्नात येऊन सांगतो, तशी कृती केल्यावर यश मिळते ! – पू. अधिवक्ता हरिशंकर जैन

भेटीच्या वेळी पू. अधिवक्ता हरिशंकर जैन म्हणाले, ‘‘हिंदु धर्माविषयीचे खटले लढतो, तेव्हा देव स्वप्नात येऊन कशी कृती करायला हवी हे सांगतो, सुचवतो आणि त्यानुसार कृती केल्यावर यश मिळते. दळणवळण बंदीच्या काळ म्हणजे देवाने दिलेली संधी होती. यात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयीचे खटले लढवण्यासाठी अभ्यास करण्याचा वेळ मिळाला. यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटली. गेल्या अनेक वर्षांपासून समिती आपत्काळाविषयी विषय सांगत होती, ते किती सत्य होती, याची प्रचीतीही या काळात सर्वांना आली.’’