शेतकर्‍यांच्या आंदोलामुळे देशाची प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी ! – सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेतून दावा

काँग्रेस १५ जानेवारीला ‘शेतकरी हक्क दिवस’ साजरा करणार

काँग्रेसने तिच्या जवळपास ५५ वर्षांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी कारभार केला असता, तर आज शेतकर्‍यांची स्थिती वाईट झाली नसती !

नवी देहली – देहलीच्या सीमेवर गेल्या दीड मासापासून कृषी कायदे रहित करण्यासाठी शेतकरी करत असलेल्या आंदोलनामुळे प्रतिदिन ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी होत आहे, असे सांगत शेतकर्‍यांना सीमेवरून हटवण्याची मागणी करणारी याचिका ऋषभ शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

१. या याचिकेत पुढे म्हटले आहे, ‘रस्ता बंद करून आंदोलन करणे हे शाहीनबाग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे.’ न्यायालयाने १६ आणि १७ डिसेंबरला दिलेल्या आदेशात शेतकर्‍यांना शांततेत आंदोलन करण्यासाठी म्हटले होते; परंतु पंजाबमध्ये शेकडो टेलिफोन टॉवरची तोडफोड झाल्याचा दावा या याचिकेत केला आहे.

२. शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ काँग्रेस १५ जानेवारीला ‘शेतकरी हक्क दिन’ साजरा करणार आहे. या दिवशी पक्षाचे नेते देशातील सर्व राज्यांच्या राजभवनांकडे कूच करणार आहेत.