भारताच्या अंतर्गत सूत्रांवर बोलणे बंद करा !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !

नवी देहली – भारताच्या अंतर्गत सूत्रांवर कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांनी प्रतिक्रिया व्यक्त करू नये, हे मी येथे सांगू इच्छितो. भारताला कुणाच्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. आम्ही आपसांत बसून समस्येवर तोडगा काढू. हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. जगातील कुठल्याही देशाला भारताच्या अंतर्गत सूत्रावर बोलायचा अधिकार नाही. भारत काही असा तसा देश नाही, जे वाटेल ते बोलाल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले. काही दिवसांपूर्वी जस्टिन ट्रूडो यांनी देहलीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर म्हटले होते की, कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनास आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत आहे. या पार्श्‍वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले.