नागरोटा येथे ठार झालेले ४ आतंकवादी भुयारातून भारतात घुसल्याचे उघड

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ४ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले होते. सुरक्षादलाच्या शोधमोहिमेत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक भुयार सापडले आहे. पाकिस्तानातून भूमीखालून येणारे हे भुयार २०० मीटर लांब आणि ८ मीटर खोल आहे. याच भुयारातून हे चारही आतंकवादी भारतात घुसले होते.

इंजिनीयरींगचे तंत्र वापरून हे भुयार बनवण्यात आले होते. ‘यामध्ये तेथील सरकारी यंत्रणेचा हात स्पष्टपणे दिसतो’, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून हे भुयार १६० मीटर लांब, तर पाकच्या बाजूला हे भुयार ४० मीटर लांब असेल, असा अंदाज आहे. भुयार पार केल्यानंतर आतंकवादी १२ किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. (याचा अर्थ भारतीय सुरक्षायंत्रणा सतर्क नाहीत, हेच स्पष्ट होते ! – संपादक) मरण्याआधी या आतंकवाद्यांनी जी.पी.एस्. उपकरणातील डाटा (माहिती) नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षायंत्रणांनी तो डाटा पुन्हा मिळवला.