नेपाळच्या भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याची घटना उघड करणार्‍या नेपाळी पत्रकाराचा रहस्यमयरित्या मृत्यू

चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट सरकार त्याच्या विरोधात असणार्‍यांना ठार करते किंवा गायब करते. तोच प्रकार त्याने नेपाळमधील साम्यवादी सरकारला हाताशी धरून या पत्रकाराच्या संदर्भात केला असल्यास आश्‍चर्य वाटू नये ! या घटनेची नेपाळमधील कम्युनिस्ट सरकार प्रामाणिकपणे चौकशी करील अशी शक्यताही अल्पच आहे !

जगात कुठेही अस्तित्वात असलेल्या साम्यवाद्यांच्या राजवटीला अन्याय आणि अत्याचारांचा इतिहास आहे. नेपाळमधील स्थिती पहाता भारताने आता चीनसह नेपाळवरही कारवाई करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बलराम बनिया यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. ते येथील ‘कांतीपूर डेली’ नावाच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक होते. १० ऑगस्ट या दिवशी ते अचानक बेपत्ता झाले आणि १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला. बलराम बनिया यांनीच प्रथम जूनमध्ये ‘चीनने नेपाळच्या रूई गावावर नियंत्रण मिळवले आहे’, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. बनिया यांच्या वृत्तानंतर नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली यांनी दावा केला होता की, ‘या गावावर चीनचे नियंत्रण नाही.’ नेपाळमधील चीनच्या राजदूतांनीही असेच स्पष्टीकरण दिले होते. या पार्श्‍वभूमीवर बनिया यांचा झालेला मृत्यू संशयास्पद आहे.
रूई गाव नेपाळच्या मानचित्रात असले, तरी त्याच्यावर चीनचे नियंत्रण आहे.

बनिया यांनी रूई गावाविषयी लिहिलेल्या बातमीत म्हटले होते की,

१. ‘भारतासमवेत कालापानीवरून सीमावाद निर्माण करणार्‍या नेपाळमधील रूई गावावर गेल्या ३ वर्षांपांसून चीनचे नियंत्रण आहे. गेली ६० वर्षे नेपाळचे नागरिक असणारे गोरखा आता चीनचे दमनकारी शासनाच्या अधीन झाले आहेत.’

२. ‘बलराम बनिया यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी’, अशी मागणी ‘नेपाल प्रेस युनियन’ने नेपाळ सरकारकडे केली आहे. या युनियनचे सरचिटणीस अजय बाबू शिवकोटी यांनी सांगितले की, ही हत्या आहे कि आत्महत्या हे अद्याप समोर आलेले नाही. बनिया यांच्या तोंडवळ्यावर अनेक घाव आहेत. त्यामुळे या घटनेची व्यापक चौकशी करून सत्य जनतेसमोर आले पाहिजे.