आंध्रप्रदेशातील तिरुपती, श्रीकालहस्ती आणि कनिपक्कम् या ३ मोठ्या मंदिरांच्या मालकीच्या इमारतींचा कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी वापर !

  • देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर हिंदूंच्या मंदिराच्या इमारती प्रशासनाला वापरण्यास दिल्या जात आहेत; मात्र अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांकडून अशा प्रकारे इमारती देण्यात आल्याचे वृत्त ऐकिवात येत नाही, असे का ?
  • हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचा डोस पाजणारे आता अन्य धर्मियांना याविषयी कृती करण्यास का सांगत नाहीत ? कि असा त्याग आणि धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंनीच दाखवायची असते, असे त्यांना वाटते ?
  • कुठे कोरोनाग्रस्तांना मंदिरांच्या इमारती वापरण्यास देणारे हिंदू, तर कुठे कोरोनायोध्ये असणार्‍या वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्यावर प्रार्थनास्थळांतून आक्रमण करणारे धर्मांध !

अमरावती (आंध्रप्रदेश) – कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवण्यासाठी किंवा त्यांचे अलगीकरण करण्यासाठी आंध्रप्रदेश राज्यातील शाळा आणि मंदिरे यांचा वापर केला जात आहे. येथील काही मंदिरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये अलगीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती, श्रीकालहस्ती आणि कनिपक्कम या मंदिरांच्या मंडळांनी मंदिरांच्या इमारती यासाठी दिल्या आहेत.

१. तिरुपती मंदिराचे श्रीनिवासम लॉज आणि माधवम लॉज हे सर्वांत मोठे लॉज आहेत. येथे सध्या अन्य राज्यांतील मजुरांना ठेवण्यात आले आहे, तसेच रेल्वे स्थानकाजवळ असणारा मंदिराचा एक लॉजही यासाठी देण्यात आला आहे. तिरुपती मंदिराचेच पद्मावती निलयम या लॉजला अलगीकरण केंद्र बनवण्यात आले आहे. या इमारतीत ५०० खोल्या असून येथे सध्या २०० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे तबलिगी जमातचेही कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त मंदिराकडून प्रतिदिन खाद्यपदार्थांची १ लाख ४० सहस्र पाकिटे वितरित केली जात आहेत. यासाठी मंदिराचे ५०० कर्मचारी काम करत आहेत.

२. आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कनिपक्कम् हे गणपतीचे मोठे मंदिर असून येथील १०० खोल्यांचे गणेश सदन अलगीकरण केंद्रासाठी देण्यात आले आहे. येथेही सर्व धर्माचे रुग्ण उपचार घेत होते आणि नंतर ते बरे झाल्यावर त्यांना सोडण्यात आले. हे सदन मंदिरापासून ३०० मीटर दूर आहे.

३. चित्तूर जिल्ह्यातीलच भगवान शिवाच्या श्रीकालहस्ती मंदिराच्या गंगा सदनचे  गेस्टहाउस प्रशासनाला कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी देण्यात आले होते. हे सदन मंदिरापासून १ कि.मी. अंतरावर आहे. येथे विविध धर्मांतील ७० जणांना ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना दुसर्‍या ठिकाणी नेण्यात आले. सध्या हे गेस्टहाऊस रिकामे आहे.