साधकांना सूचना : साधकांनो, पुढील पिढ्या घडवण्यासाठी तुमचे साधनेतील अनुभव नियमित लिहून द्या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सध्याच्या साधकांना सत्संग, ग्रंथ, सेवेतील अनुभव, व्यष्टी साधनेचे आढावे यांसारख्या विविध माध्यमांतून साधनेचे विविध पैलू शिकायला मिळत आहेत. काही साधक २०-२५ वर्षे या सर्व प्रक्रियेतून शिकत आहेत. या साधकांना सगळे शून्यातून शिकावे लागत असल्यामुळे त्यासाठी खूप अधिक कालावधी द्यावा लागत आहे. त्यांचे हे सर्व अनुभव आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे त्यांनी लिहून दिल्यास पुढील पिढ्यांतील साधकांना ते शिकण्यासाठी इतका वेळ द्यावा लागणार नाही.

विविध साधकांचे लिखाण प्रायोगिक स्तरावरील असल्यामुळे पुढील पिढ्यांना त्यांच्या प्रकृतीनुसारही साधनेसाठी अपेक्षित उपाययोजना मिळेल. जुन्या साधकांच्या अनुभवांचा अभ्यास केल्यास त्यांचे २५ वर्षांतील शिकणे १०-१२ वर्षांत होईल. यातून नवीन पिढी लवकर तयार होऊ शकते. पुढील पिढीचा वेळ वाचून त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल.

यासाठी साधकांनो, साधना करतांनाचे तुमचे अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे नियमित लिहून पाठवा.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.७.२०२६)