बांगलादेशाने १० घुसखोरांना त्यांच्या सीमेमध्ये घेण्यास केला विरोध

बंगालमधील बांगलादेश सीमेवर पुन्हा तणाव

ढाका (बांगलादेश) – भारत आणि बांगलादेश सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या वेळी मेहरपूरच्या नजीराकोना सीमेवर दोन्ही बाजूंच्या सुरक्षादलांमध्ये संघर्ष झाला. बॉर्डर गार्ड बांगलादेशाने (‘बीजीबी’ने) आरोप केला आहे की, भारताच्या सीमा सुरक्षा दलाकडून त्यांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे १० लोकांना पाठवण्याचा प्रयत्न केला गेला. भारताच्या या प्रयत्नाला बीजीबी आणि स्थानिक लोकांनी कडाडून विरोध करून तो हाणून पाडला.

नजीराकोनाचे बीजीबी तळाचे कमांडर नायक सुभेदार मोझम्मेल हक यांनी म्हटले आहे की, आम्हाला भारतीय बाजूकडून ‘पुश-इन’ (लोकांना बेकायदेशीरपणे ढकलण्याचा प्रयत्न) होत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर बीजीबीचे सैनिकी आणि स्थानिक लोक यांनी मोर्चा सांभाळला आणि भारतातून लोकांना बलपूर्वक आत पाठवण्याच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रयत्नाला तीव्र विरोध केला. या विरोधानंतर दलाने त्या लोकांना सीमेवरून परत भारतीय हद्दीत घेण्याचा निर्णय घेतला. जून महिन्यात मेहरपूर सीमेवर दलाने बलपूर्वक लोकांना पाठवण्याचा हा सहावा प्रयत्न केला होता; मात्र बीजीबी आणि सीमेजवळ रहाणार्‍या सजग लोकांमुळे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

बांगलादेश सरकारने याकडे लक्ष द्यावे ! – बांगलादेशाचे विरोधी पक्षनेते

या प्रकरणी बांगलादेशाचे विरोधी पक्षनेते नाहित इस्लाम यांनी म्हटले की, भारताचे सीमा सुरक्षा दल लोकांना बलपूर्वक बांगलादेशाच्या सीमेत ढकलण्याचा (पुश-इन) प्रयत्न करत आहे. यामुळे सीमेवर संघर्ष होत आहे. तारिक रहमान यांच्या सरकारने या गंभीर विषयाकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी केली.

भारत-बांगलादेश यांच्यात बैठक होऊनही तणाव कायम

भारत आणि बांगलादेश सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन याविषयी देहलीत ८ ते ११ जून या काळात बीजीबी आणि सीमा सुरक्षा दल यांच्या महासंचालक पातळीवर झालेल्या बैठकीत बेकायदेशीर घुसखोरी आणि सीमापार गुन्ह्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. दोन्ही बाजूंनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष सीमेवरील तणाव मात्र अजूनही कायम आहे.

संपादकीय भूमिका

मागील काही दिवसांच्या घडामोडी पहाता बांगलादेश सरकार बांगलादेशी घुसखोरांना परत घेईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भारतानेही आता या घुसखोरांना हाकलण्यासाठी अन्य पर्याय लागू करणे आवश्यक !