भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार

  •  रत्नागिरी विमानतळाचा ७५ टक्के टप्पा पूर्ण

  • ३ महिन्यात पहिले उड्डाण ! - पालकमंत्री डॉ. उदय सामंत  

रत्नागिरी, ५ जुलै – रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात सामंजस्य करार स्वाक्षरी करण्यात आला. या करारामुळे रत्नागिरी विमानतळाच्या ७५ टक्के यशस्वी टप्पा पूर्ण झाला असून येत्या ३ महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण (टेकऑफ) होईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी येथे केली, तसेच पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित या विशेष करार प्रसंगी जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, एम्.ए.डी.सी.चे उपाध्यक्ष दीपक कपूर, आय.सी.जीए.एस्.चे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले,

१. विमानतळाच्या भूसंपादनासाठी कोणतीही अडचण येऊ नये; म्हणून १० ते १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. रत्नागिरीत ‘ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’ यांसारखी पंचतारांकित हॉटेल्स यावीत यासाठी प्रयत्न चालू आहेत.

२. वन विभागाच्या जागेवर ‘ॲडव्हेंचर पार्क’ उभारले जाईल, ज्याचे मुख्य आकर्षण ‘झाडावरचे रेस्टॉरंट’ असेल.

३. स्थानिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी रत्नागिरी विमानतळावर स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन (स्टॉल) उपलब्ध करून दिले जाईल.

४. विमानतळ चालू झाल्यामुळे रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि काजू थेट परदेशात निर्यात करणे अधिक सोपे होईल.

एम्.ए.डी.सी.चे उपाध्यक्ष दीपक कपूर म्हणाले की, विमानतळामुळे पर्यटनासमवेत स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला मोठे साहाय्य होईल. जागतिक आकडेवारीनुसार, विमानतळ १० वर्षे यशस्वी चालल्यास त्या भागाच्या जीडीपीमध्ये (GDP) थेट ८ टक्के वाढ होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’ वाढवण्यावर आमचा भर आहे.

कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक म्हणाले, ‘‘लष्करी आणि नागरी विमान वाहतुकीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण राखणे, हे आपले सामूहिक दायित्व आहे. परिसरात स्वच्छता राखून पक्षांमुळे होणारा विमानांचा धोका शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’’