बोगस पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे आधार कार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत जाणार !

जळगाव – खरीप हंगामासाठी पीक विमा काढण्याची प्रक्रिया १ जुलैपासून चालू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात केळी आणि खरीप पिकांच्या विम्यात बोगस विमा काढण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. अशा ४४ सहस्र हेक्टरवरील विम्याची चौकशी होणार आहे. पीक विम्याच्या संदर्भातील अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जे शेतकरी खोटा पीक विमा काढतील, त्यांचे आधारकार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना पुढील ५ वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. बोगस विमा काढणार्‍यांवर फसवणुकीचे गुन्हेही नोंद करण्यात येतील, असे प्रशासनाने येथे घोषित केले आहे.