सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ (दुपारी साडेतीन ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि नंतर ६.२० वाजल्यापासून ७.३० वाजेपर्यंत) पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

१. यज्ञ पहातांना मन एकाग्र होणे 

‘श्री राजमातंगी महायज्ञाला प्रारंभ झाल्यापासूनच माझे मन एकाग्र झाले. नंतर मला ‘सेवेला जायचे आहे’, याची जाणीव झाली. मी ५ वाजता सेवेला जाण्याच्या ऐवजी ६ वाजता सेवेला गेले.

२. सेवा करायला जात असतांना पायांत वेदना होणे आणि त्यानंतर आश्रम परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिराकडे लक्ष जाणे 

मी सेवा करण्यासाठी जात असतांना माझे दोन्ही पाय एवढे दुखत होते की, ‘मला नीट उभे रहाता येत नव्हते.’ मी कशीबशी चालत सेवेच्या ठिकाणी जायला आश्रमाच्या मुख्य द्वारातून बाहेर पडले. तेव्हा माझे लक्ष श्री सिद्धिविनायक मंदिराकडे गेले आणि माझे हात आपोआपच जोडले गेले. ‘देवा, तुम्ही तर प्रत्यक्ष यज्ञाच्या ठिकाणी आहात’, असा विचार माझ्या मनात आला.

३. सेवा झाल्यावर यज्ञ पहाण्यासाठी एकाच स्थितीत आसंदीवर बसणे, मन निर्विचार होणे आणि १ मासापासून दोन्ही गुडघ्यांत होत असलेल्या वेदना यज्ञसमाप्तीनंतर दूर झाल्याचे अनुभवणे 

सौ. अंजली रसाळ

मी सेवा झाल्यावर यज्ञाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण पहाण्यासाठी सभागृहात बसले. यज्ञाच्या वेळी माझे मन निर्विचार होते. संपूर्ण यज्ञ होईपर्यंत मी एकाच स्थितीत आसंदीवर बसले होते. यज्ञ संपल्यानंतर मी उभी राहून चालू लागले. तेव्हा माझ्या दोन्ही गुडघ्यांतील वेदना नाहीशा झाल्या होत्या. मला सहजतेने चालता येत होते. मागील १ मासापासून मी गुडघेदुखीने त्रस्त होते. माझ्या मनात ‘गुडघ्याचे शस्त्रकर्म करून तरी वेदना थांबतील का ?’, असा विचार येत होता. माझ्या उजव्या गुडघ्यामध्ये असणारी कुर्चा (गादी) पूर्ण झिजली आहे. त्यामुळे उजव्या गुडघ्यातील हाडांचे घर्षण होऊन वेदना होतात.

गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला यज्ञाचे प्रक्षेपण पहाता आले आणि श्री राजमातंगी देवीची कृपा अनुभवता आली. आता माझे गुडघे पूर्वीसारखे दुखत नाहीत. ‘काय जादू झाली ?’, ते माझ्या लक्षात आले नाही.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अशक्य काहीच नाही’, याची मला प्रचीती आल्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अंजली जयवंत रसाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक