गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे

‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’ यांच्या वतीने सभेचे आयोजन

डावीकडून श्री. राजकुमार जाजू, बोलतांना पू. किशोरशास्त्री दवे , श्री. एम्. नागेश्वर राव आणि अधिवक्ता शिल्पन गावकर

मुंबई – आतापर्यंत गायीवर अनेकदा संशोधन झाले आणि पुढेही होत राहील. देवता आणि ऋषि-मुनी यांनीही गायीचा महिमा वर्णिला आहे. इंग्रज गायीची चरबी काडतुसामध्ये वापरणार होते; म्हणून क्रांतीकारक मंगल पांडे यांनी बलीदान दिले. वर्ष १९६६ मध्ये प.पू. करपात्री स्वामीजी यांच्या नेतृत्वात झालेल्या गोरक्षा आंदोलनात अनेक संत आणि गोरक्षक यांनी बलीदान दिले. ‘गायीची हत्या करणार्‍यांसह त्याचे समर्थन करणार्‍यांनाही पातक लागते’, असे वेदांमध्ये सांगितले आहे; मात्र आज प्रतिदिन ७० ते ८० सहस्र गायींची हत्या होते. वर्ष २०१४ मध्ये गोमांस निर्यातीत भारत ९ व्या स्थानावर होता. आता ब्राझीलनंतर दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे वेळीच गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा, तसेच गोहत्या प्रतिबंध, गोसंरक्षण, गोप्रतिष्ठा करा, असे आवाहन पू. किशोरशास्त्री दवे यांनी केले.

ते बोरिवली येथे ‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’ यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या  सभेत बोलत होते. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (‘सीबीआय’चे) माजी संचालक श्री. एम्. नागेश्वर राव, ‘स्वस्तिश्री त्रिवेणी फाऊंडेशन’चे श्री. राजकुमार जाजू आणि अधिवक्ता शिल्पन गावकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. लेखिका आणि ‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’च्या संस्थापिका सौ. रती हेगडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाला गोरक्षक आणि हिंदु धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदूंची मंदिरे सरकारमुक्त व्हायला हवीत ! – एम्. नागेश्वर राव, माजी संचालक, सीबीआय

‘सीबीआय’चे माजी संचालक एम्. नागेश्वर राव यांनी तथ्य शोधन अहवाल सादर केला. ते म्हणाले, ‘‘भारत देश मांस निर्यातीत आघाडीवर येत असून बाहेरच्या लोकांना मांस खाऊ घालण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे दिसत आहे. सद्यःस्थितीत देशभरातील २ लाख मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत; मात्र चर्च आणि मशिदी सरकारने कह्यात घेतलेल्या नाहीत. आपली मंदिरे मुक्त झाली पाहिजेत.’’

गोरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा ! – राजकुमार जाजू, स्वस्ती श्री त्रिवेणी फाऊंडेशन

सनातन धर्म प्राचीन आहे. सनातन धर्मावर मोगल, इंग्रज आदी सर्वांची पुष्कळ आक्रमणे झाली; मात्र सनातन धर्म अजूनही टिकून आहे. इंग्रजांनी जातीभेद निर्माण करून फूट पाडली. पूर्वी ऋषि-मुनींना राजाश्रय होता. पूर्वीच्या युगात राजांकडे गायींचे कळप होते. आता गोमाता संकटात आहे, गोरक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.

‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूपा’ला विरोध करा ! – अधिवक्ता शिल्पन गावकर

महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित झालेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप २०२६’ नुकताच स्थगित करण्यात आला. या कायद्याला मंदिर विश्वस्त आणि मंदिर क्षेत्रात कार्य करणार्‍यांचा विरोध झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला. केवळ हिंदूंच्या देवस्थानांची साडेचार लाख हेक्टर इनाम भूमी कह्यात घेण्याचे सरकारचे धोरण होते; अन्य धर्मियांना या कायद्यातून पूर्णपणे सवलत दिली. भविष्यातही सरकार या कायद्याचा प्रस्ताव आणू शकेल. मंदिर विश्वस्त आणि हिंदु संघटना यांनी सतर्क राहून प्रस्तावित कायदा मंदिरांच्या जागा हिरावून घेणारा असेल, तर तीव्र विरोध करावा.