विधीमंडळ प्रशासनाचा अनागोंदी कारभार
सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष !
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, मुंबई

मुंबई – सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे विधानभवनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली आहे. एकीकडे सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात येत असतांना विधानभवनाच्या वाहनतळाच्या (पार्किंगच्या) परिसरातील पडून असलेल्या आणि सडलेल्या गाड्यांकडे मात्र सुरक्षा व्यवस्थेचे दुर्लक्ष होत आहे. तेथे १५ हून अधिक गाड्या वर्षानुवर्षे बेवारसपणे एकाच जागी पडून अक्षरश: सडत आहेत. यामध्ये चारचाकी, दुचाकी, बग्गी यांचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये स्फोटकांसारखे साहित्य ठेवून कुणी विघातक शक्तींनी घातपात घडवून आणल्यास केवढ्यात पडेल ? त्यामुळे प्रशासनाने या गाड्यांचा तत्परतेने सोक्षमोक्ष लावणे आवश्यक आहे.

१. विधानभवनाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर वाहनतळ क्षेत्र आहे. अधिवेशनकाळात विधीमंडळाचे अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्री, मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या गाड्या या परिसरात लावल्या जातात. सर्व मान्यवरांना विधानभवनात जाण्यासाठी चालक त्यांना प्रवेशद्वारावर सोडून गाडी वाहनतळामध्ये लावतात आणि मान्यवर बाहेर येण्याच्या वेळी पुन्हा प्रवेशद्वारावर गाडी आणली जाते.

२. मंत्री आणि अधिकारी स्वत: वाहनतळ क्षेत्रात जात नसले, तरी सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. या गाड्यांची स्थिती पाहिल्यावर विधीमंडळ प्रशासनाची अकार्यक्षमता लक्षात येते.

लक्षात आणून दिल्यावर कार्यवाहीची ग्वाही !
विधीमंडळ आवारातील या पडून असलेल्या गाड्यांविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विधीमंडळाचे मालमत्ता व्यवस्थापक प्रदीप टिबे यांना विचारले असता त्यांनी ‘या गाड्या मंत्रालयातील विविध विभागांच्या आहेत’, असे सांगितले. ‘या गाड्या घेऊन जाण्याविषयी संबंधित विभागांना कळवले का ? या प्रकाराविषयी विधानसभेच्या अध्यक्षांना ठाऊक आहे का ?’ असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना याविषयी माहिती देऊन त्यांची अनुमती घेऊन मंत्रालयातील संबंधित विभागांना परिपत्रक पाठवतो. परिपत्रकाद्वारे संबंधित विभागांना ठराविक कालावधीपर्यंत या गाड्या घेऊन जाण्यास सांगण्यात येईल.’’

एकूणच विधानभवनासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सरकारच्याच अनेक गाड्या वर्षानुवर्षे सडलेल्या स्थितीत रहाणे, या गाड्यांविषयी इतकी वर्षे संबंधित सरकारी विभागांशी साधा पत्रव्यवहारही न करणे आणि गाड्यांची दु:स्थिती उघडपणे दिसत असूनही त्यावर निर्णय न घेणे, यावरून विधीमंडळ प्रशासनाची कमालीची अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणा दिसून येतो. यापुढे तरी प्रशासनाने पुढील कार्यवाही करून या सडलेल्या गाड्यांविषयी योग्य निर्णयप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
New FCRA Rules : ‘धार्मिक कृती’च्या नावाखाली धर्मांतर करणार्यांच्या परदेशी देणग्यांवर केंद्र सरकारचा प्रहार
Maharashtra Uniform Civil Code : महाराष्ट्रात सिद्ध केले जाणार समान नागरी कायद्याचे प्रारूप ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘नीट’ परीक्षेमुळे विषमता निर्माण होत असल्याने इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्या ! – Tamil Nadu CM Vijay
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !