महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis

  • १ सहस्र ६२६ आरोपींना अटक

  • महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी सरकार तत्पर असल्याची स्पष्टोक्ती !

मुंबई – राज्यात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी राज्यात १ सहस्र १४२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत १ सहस्र ६२६ आरोपींना अटक केली आहे. अमली पदार्थ सेवनाच्या विरोधात ३ सहस्र १९९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सभागृहात अमली पदार्थ माफियांच्या विरोधात विचारलेल्या विविध प्रश्नांवर ते बोलत होते. ‘मुंबई आणि महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी सरकार तत्पर आहे’, असेही त्यांनी सांगितले. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह ही माहिती मांडली. यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवले, तसेच पोलिसांविषयी गंभीर आरोप केले. त्यालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तरे दिली.

मुख्यमंत्री म्हणाले,

१. मुंबईसह राज्यभरात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी ‘अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स’ कार्यरत आहेत. वर्ष २०२५ मध्ये हे पथक आणि पोलीस यांनी मिळून ५२३ कोटी १७ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट केले.

२. अमली पदार्थ तस्करी आणि विक्री यांच्या संदर्भात शासनाचे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण असून दोषी आढळणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यावरही कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

विरोधकांनी केलेल्या आरोपांची जंत्री !

पोलीस मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी करत आहेत. त्यांच्यावर थेट कारवाई करावी. ‘आमच्याकडे ऑनलाईन अमली पदार्थ दिले जात आहेत’, असा आरोप शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला, तर अमली पदार्थांची यंत्रणा पोलिसांच्या संगतमतानेच कार्यरत होत असल्याचा आरोप नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. ‘पोलीस अमली पदार्थविरोधात कारवाई करत नाहीत’, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला. ‘अमली पदार्थ तस्करी हा राज्यातील गंभीर गुन्हा झाला आहे. अमली पदार्थ विरोधी विभाग काय करत आहे ? राज्याबाहेर बंदरावर अमली पदार्थ सापडतात, तिकडे पोलीस पाठवा’, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

अमली पदार्थ प्रकरणातील दोषी अधिकार्‍यांना बडतर्फ केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती !

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना मुख्यमंत्री म्हणाले,

१. अभियान, तसेच नशामुक्ती जनजागृती यांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अशा प्रकरणात जेवढे पोलीस दोषी आढळले, त्यांना बडतर्फ केले आहे.

२. अमली पदार्थ विरोधी पथक आपण विस्तारित केले आहे. हा विभाग प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत केला जाईल. चांगले अधिकारी अँटी फोर्समध्ये (विशेष दलात) देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी प्रतिदिन नार्को चाचणीविषयी माहिती घेणार आहे.

३. मुंबईत ३ सहस्र शाळा-महाविद्यालयांमध्येही अमली पदार्थविरोधी कार्यक्रम हाती घेतला आहे. यांसंदर्भात आपण मोहीमही हाती घेत आहोत. जे अमली पदार्थांची माहिती देतील, त्यांना पारितोषिक देण्यात येईल. माहिती देणार्‍याची ओळख आम्ही गुप्त ठेवू.

४. अमली पदार्थ प्रकरणातील प्रमुख सलीम डोळा याला अटक करण्यात आली. सातार्‍यात एक कारखाना सापडला होता, तोही त्याचाच होता.

५. विविध राज्यात जाऊन मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ उद्ध्वस्त केले आहेत.