जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !

अन्न व औषध प्रशासनाची मर्यादित मनुष्यबळात धडक कारवाई

रत्नागिरी – जिल्ह्यातील विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ७ मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत एकूण ६ लाख ७ सहस्र १३५ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित सर्व प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील ही जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने चालूच रहाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त (अन्न) मि.र. महांगडे यांनी दिली आहे.

६० अन्न आस्थापनांची तपासणी

जिल्ह्यात अन्न सुरक्षा दर्जेदार रहावी यासाठी प्रशासनाने एकूण ६० अन्न आस्थापनांची कसून पडताळणी केली आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील १० आस्थापनांचा समावेश असून प्रामुख्याने बेकरी, हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सची पडताळणी करण्यात आली. तालुक्यातील गिम्हवणे येथील ‘मे. श्री स्टोअर्स’ आणि केळसकर नाका येथील ‘अश्पाक महमुद मणियार’ यांच्या पान शॉपवर अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी छापे टाकले. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल पान मसाला, आर्.एम्.डी. पानमसाला आणि अन्य आरोग्यास घातक असलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मर्यादित मनुष्यबळातही कामगिरी

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे सध्या केवळ ४ अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यातही खेड, दापोली आणि मंडणगड या विस्तीर्ण आणि संवेदनशील क्षेत्रासाठी केवळ एकाच अधिकार्‍यावर दायित्व आहे; मात्र अशा मर्यादित मनुष्यबळाचा सामना करत असतांनाही विभागाने जिल्ह्यात धडक आणि प्रभावी कामगिरी बजावली आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्न आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.