देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी

नवी देहली – भूमी आणि सागरी सीमा यांच्या जवळ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमण होऊ शकते, अशी चेतावणी जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सागरी सुरक्षा विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याची चेतावणी दिली आहे. संवेदनशील ठिकाणी ‘अँटी-ड्रोन’ (ड्रोनविरोधी) प्रणाली तैनात करण्याची सूचना देण्यात आली आहे.

‘द हिंदु’च्या वृत्तानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही डी.आर्.डी.ओ. (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था), गुप्तचर विभाग, विमानतळ प्राधिकरण आणि सीमा सुरक्षा दल यांच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेले पथक सिद्ध केले आहे. या पथकाच्या अहवालानंतर आणि गृह मंत्रालयाच्या संमतीनंतर संवेदनशील ठिकाणी ‘अँटी-ड्रोन’ प्रणाली बसवण्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तथापि पाकिस्तान सीमेवरील पंजाबमधील काही भागांत या प्रणालींच्या चाचण्या चालू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांचे देशाकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, अशी पत सरकारने निर्माण करणे आवश्यक !