बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !

  • कट्टरतावादी इस्लामी गटांच्या दबावापुढे झुकत प्रशासनाचा निर्णय

  • पाकची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’चा कट्टरतावाद्यांना आर्थिक साहाय्य असल्याचा संशय

ढाका (बांगलादेश) – येथील गायबांधा जिल्ह्यातील ‘सनातन धर्म संकुला’च्या विरोधात कट्टरतावादी मुसलमानांनी आंदोलन, तसेच धमकावल्यामुळे बांगलादेश सरकारने त्याचे बांधकाम थांबवल्याची घटना ताजीच आहे. अशातच कट्टरतावाद्यांच्या मागणीसमोर झुकत प्रशासनाने बोगरा जिल्ह्यातील ‘शिवगंज’ उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ करण्याची प्रक्रिया चालू केल्याचे समोर आले आहे. या नावात असलेल्या हिंदु धार्मिक संदर्भामुळे आक्षेप घेण्यात आला होता. ‘प्रशासनाचे हे पाऊल म्हणजे देशाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक ओळखीशी निगडित चिन्हे हळूहळू काढून टाकण्याच्या प्रक्रियेचा आरंभ आहे’, असे म्हटले जात आहे.

लक्ष्मीपूर, शंभूगंज, नारायणगंज, ब्राह्मणबारिया, जॉयपूरहाट, ठाकूरगाव आणि गोपालगंज या गावांचे नाव पालटण्याचेही षड्यंत्र !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवगंजचे प्रकरण ही काही एकमेव घटना नाही. भविष्यात लक्ष्मीपूर, शंभूगंज, नारायणगंज, ब्राह्मणबारिया, जॉयपूरहाट, ठाकूरगाव आणि गोपालगंज यांसारख्या इतर ठिकाणांच्या नावांच्या संदर्भातही असाच दबाव आणला जाऊ शकतो, अशी भीती हिंदु समुदायाकडून व्यक्त केली जात आहे. जरी या विषयावर अद्याप कोणतेही अधिकृत राष्ट्रीय धोरण घोषित करण्यात आलेले नसले, तरी या चर्चांमुळे हिंदु समुदायात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

‘ढाकेश्वरी देवी’च्या नावाने असलेली राजधानी ढाका हिचे नाव ‘जहांगीरनगर’ करण्याचाही डाव !

ढाका येथील ‘ब्लिट्ज वीकली’चे वरिष्ठ संपादक सलाह उद्दीन शोएब चौधरी यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने यासंदर्भात चर्चा केली. त्यावर चौधरी म्हणाले की, बांगलादेशातील हिंदुविरोधी कारवायांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ पाठिंबा आणि आर्थिक साहाय्य करत आहे. आमचे ढाका या प्राचीन शहराचे नाव येथील ढाकेश्वरी देवीच्या मंदिरावरून पडले आहे. याला मोगल काळात जहांगीरनगर म्हटले जायचे. आताही धर्मांध मुसलमान राजधानीचे नाव पालटून जहांगीरनगर करण्यासाठी आवाज उठवत असतात. तथापि बहुतांश नागरिकांची ‘ढाकेश्वरी देवी ढाका शहराचे रक्षण करते’, अशी श्रद्धा आहे. आम्ही सर्व बंगाली आहोत, तर कट्टरतावादी मुसलमान केवळ ३ टक्के आहेत. आम्ही कधीच ढाक्याचे नाव पालटू देणार नाही, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी या वेळी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

भारतातील हिंदूंनो, एकेकाळी हिंदूंच्या ‘बंगभूमी’ची आज काय दुर्दशा झाली आहे, हे पहा ! आताही तुम्ही जागृत झाला नाहीत, तर तुमच्या राज्याची ही स्थिती होण्यास काही दशकेच शेष आहेत, हे विसरू नका !