सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !

  • परिसरातील सरोवराला मुसलमानही भेट देत असल्याने हिंदूंकडून संताप व्यक्त

  • येणार्‍या मुसलमानांना गोमूत्राने स्नान अनिवार्य करण्याची चेतावणी

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील ‘श्री गोगा मढी’ या हिंदूंच्या धार्मिक स्थळाला मनोरंजनाचे स्थळ म्हणून रूपांतरित केल्यावरून हिंदूंनी विरोध केला आहे. येथील गोगा मढी संकुलात असलेल्या ‘गोरक्ष गंगा सरोवर’ला ‘फन पॉईंट’ (मौजमजा करण्याचे ठिकाण) जात असल्याचा आरोप करत हिंदु संघटनांनी आंदोलन चालू केले आहे. हिंदूंच्या या तीर्थक्षेत्री मुसलमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील धार्मिकतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा आरोप ‘गोगा मढी सुधार सभे’चे अध्यक्ष अनिल प्रताप सैनी यांनी केला आहे.

यावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सहारनपूरचे जिल्हाधिकारी अरविंद कुमार चौहान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.

हिंदुत्वनिष्ठांकडून शुद्धीकरण विधी !

मुसलमानांच्या या परिसरातील प्रवेशानंतर तेथे स्थापित असलेल्या ‘जाहरवीर गोगाजी महाराज’ यांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि पूजाविधी करण्यात आले. यासंदर्भात अनिल प्रताप सैनी म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या वर्षी येथे ‘गोरक्ष गंगा सरोवरा’चे उद्घाटन केले. हे स्थळ लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आमच्या समितीशी कोणतीही चर्चा न करता या सरोवराचे स्वरूप पालटण्यात आले असून आता ते एखाद्या धार्मिक स्थळाऐवजी मौजमजेचे केंद्र वाटत आहे. यास येथील महानगरपालिका प्रशासन उत्तरदायी आहे.

दोन्ही प्रवेशद्वारांवर ‘गोमूत्र प्रकल्प’ उभारणार !

सैनी यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, या धार्मिक स्थळावरील प्रवेश केवळ सनातन धर्माच्या अनुयायांपुरताच मर्यादित ठेवण्यात यावा. त्यांच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल. या धार्मिक स्थळाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर ‘गोमूत्र प्रकल्प’ उभारण्याची सिद्धता चालू करण्यात आली आहे. या प्रवेशद्वारांतून आत येणार्‍या कोणत्याही मुसलमान व्यक्तीला गोमूत्राने स्नान करणे अनिवार्य असेल. या मोहिमेसाठी आम्ही गावागावांत संपर्क करणार आहोत. आवश्यकता भासल्यास आम्ही स्वतःला अटक करून घेण्याची सिद्धताही ठेवू.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देशात, त्यातही योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही. याला उत्तरदायी असलेले प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर कारवाई होण्यासाठी देशभरातील हिंदूंनी आवाज उठवावा !