‘श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘श्रीसत्‌शक्ति ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति’ ही ब्रह्मांडातील शक्ती आहे. तो देह नाही. ती निर्गुणातील शक्ती आहे. त्या शक्तीला आम्हीही नमस्कार करतो. तो आमचा भाव आहे. ‘ती शक्ती आम्ही आहोत’, असे नाही. तशी आम्हाला जाणीवही नसते; म्हणून तर त्या पदव्या आम्हाला दिल्या आहेत, नाहीतर त्यातूनच आमचा अहं वाढला असता आणि आमची घसरण झाली असती. जेव्हा ‘घसरण होणार नाही’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मनात येते, तेव्हाच ती पदवी दिली जाते. ‘श्रीसत्‌शक्ति, चित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म आहे. या शब्दांमध्ये पुष्कळ शक्ती आहे. ते शब्द उच्चारल्यावर त्यातून चैतन्य आणि तत्त्व मिळते. त्या शब्दब्रह्माला आमचा नमस्कार आहे. आपल्याला त्या स्तरापर्यंत जायचे आहे. तो देह नाही, तर ते तत्त्व आहे. ते प्रकाशमान ब्रह्म आहे आणि कुठेतरी ते विराजमान आहे.

आम्हाला कुणी ‘श्रीसत्‌शक्ति ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति’ म्हणावे’, अशी आमची अपेक्षा नसते. कोणताही शब्द उच्चारला की, त्याच्यासमवेत त्याची शक्ती येते. म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ या एकत्र असतात. ‘श्रीसत्‌शक्ति’ म्हटल्यावर त्या शब्दांतील चैतन्य लगेच आपल्या शरिरामध्ये प्रवेश करत असते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (२१.९.२०२५)