ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !

  • व्यावसायिक वापरकर्त्यांना किरकोळ पेट्रोलपंपांवरून इंधन खरेदीस मनाई

  • सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारचा निर्णय

नवी देहली – इराण-अमेरिका युद्धामुळे तेलसंकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतात अजूनही अडीच महिन्यांचे इंधन शेष आहे. यामुळे चिंतेचे कारण नाही, असे केंद्र सरकारने नुकतेच स्पष्ट केले. आता सर्वसामान्य ग्राहकांना डिझेल मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण आदेश प्रसारित केला आहे. यांतर्गत ग्राहकांना एका दिवसात अधिकाधिक २०० लिटर डिझेल खरेदी करता येणार आहे. या डिझेलची पुनर्विक्री करण्यास सक्त मनाई आहे. महत्त्वाचे म्हणजे कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्ते आता किरकोळ पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करू शकणार नाहीत. सध्या पुढील ९० दिवसांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ११ जूनला देण्यात आले. व्यावसायिक खरेदीदारांना डिझेल खरेदी करण्यासाठी केवळ मोठ्या प्रमाणावर विक्री करणार्‍या केंद्रांवरूनच (‘बल्क सेल पॉईंट्स’वरूनच) इंधन खरेदी करावे लागेल.

सरकारला का घ्यावा लागला निर्णय ?

देशातील काही भागांमधील किरकोळ पेट्रोलपंपांवर इंधनाच्या विक्रीत अचानक आणि असामान्य वाढ झाल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले. सरकारचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही. सरकारला अन्वेषणातून असे दिसून आले की, किरकोळ आणि घाऊक दरांमधील मोठ्या तफावतीमुळे कारखाने अन् व्यावसायिक ग्राहक यांनी घाऊक स्वरूपात इंधन खरेदी करणे थांबवले. त्याऐवजी त्यांनी इंधन खरेदीसाठी आपली वाहने थेट किरकोळ पेट्रोल पंपांवर पाठवणे चालू केले. यामुळे सामान्य जनतेसाठी इंधन तुटवड्याचा धोका निर्माण झाला.

देहलीचे उदाहरण घेतल्यास किरकोळ पंपांवर डिझेलची किंमत ९५.२० रुपये प्रति लिटर आहे, तर घाऊक स्वरूपात डिझेल खरेदी करणार्‍या उद्योगांना १३४.५० रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. यात प्रति लिटर साधारण ३९.३० रुपयांचा थेट फरक आहे.

सामान्य जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारी तेल आस्थापनांनी किरकोळ पंपांवरील दरांमध्ये मोठी वाढ केली नाही. तथापि मोठे कारखाने आणि वाहतूक आस्थापने यांसारख्या घाऊक ग्राहकांसाठीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारभावाशी जोडलेले ठेवण्यात आले, ज्यामुळे घाऊक दरांमध्ये मोठी वाढ झाली.