Northeast AFSPA Exit : पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ हटवला जाऊ शकतो ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान

नवी देहली – पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ (अफस्पा) हटवला जाऊ शकतो, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.

आसाम-नागालँड सीमेवर तेल आणि खनिजे यांच्या उत्खननासाठी केंद्र सरकार, तसेच आसाम अन् नागालँड यांची राज्य सरकारे यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्या वेळी गृहमंत्री बोलत होते.

गृहमंत्री पुढे म्हणाले की, ईशान्य भारतात कायमस्वरूपी शांतता आणि विकास साधण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वर्ष २०१९ पासून अनेक शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे हिंसक घटनांमध्ये ८० टक्क्यांनी घट झाली असून ‘सशस्त्र दल कायद्या’च्या कक्षेत येणार्‍या एकूण क्षेत्रफळातही ८० टक्क्यांनी घट झाली आहे. आज संपूर्ण ईशान्य भारत ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने पुढे जात आहे. हा करार या क्षेत्राच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल.