योगी आदित्यनाथ सरकार ‘तिहेरी तलाक’च्या पीडितांना देणार घरे आणि आरोग्य सुविधा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण साधण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार एका नवीन उपक्रमावर काम करत आहे. याद्वारे ‘तिहेरी तलाक’ आणि आम्ल (ॲसिड) आक्रमण यांसारख्या गंभीर परिस्थितींचा सामना करणार्‍या महिलांना घरे अन् आरोग्य सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.

प्रस्तावित योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना ‘प्रधानमंत्री गृह योजना’ आणि ‘मुख्यमंत्री गृह योजना’ यांच्या माध्यमांतून कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली जातील. या जोडीला त्यांना ‘आयुष्मान भारत’ आणि ‘मुख्यमंत्री जन आरोग्य योजना’ यांसारख्या आरोग्य विमा योजनांशीही जोडले जाईल. राज्याचा महिला कल्याण विभाग या उपक्रमाच्या कार्यवाहीची प्रक्रिया करत आहे. यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित केल्या जात आहेत.

संपादकीय भूमिका

यासमवेतच अशा प्रकारे अन्याय सहन करायला लावणार्‍या विचारसरणीवरही कायमस्वरूपी तोडगा काढला जावा, अशी समाजात भावना आहे !