आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !

(उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

दोडामार्ग – तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्र (एम्.आय.डी.सी.) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खनिज उत्खनन चालू आहे; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रकरणी पंचनामा करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संपूर्ण परिसराची पहाणी करून अवैध उत्खनन करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाने प्रशासनाला दिली आहे.

उबाठाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी याविषयीचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा एम्.आय.डी.सी. कार्यालय, कुडाळ यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की ….

१. दोडामार्ग तालुक्यात उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या उद्देशाने अनेक वर्षांपूर्वी आडाळी येथे महाराष्ट्र शासनाने एम्.आय.डी.सी.ची स्थापना केली; मात्र या परिसरात आजपर्यंत अपेक्षित उद्योगधंदे उभे राहिले नाहीत. त्याऐवजी भूमीच्या सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त माती आणि इतर खनिजे यांचे उत्खनन करून त्यांची बाहेर विक्री केली जात आहे.

२. याविषयी प्रशासनाशी अनेक वेळा संपर्क साधूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उत्खननासाठी आवश्यक अनुमती किंवा अधिकृत माहिती उपलब्ध नसतांनाही मोठ्या प्रमाणात खनिजाची चोरी चालू आहे.

३. आमदार महेश सावंत, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उबाठा पक्षाचे पदाधिकारी आडाळी एम्.आय.डी.सी. परिसरात जाऊन पहाणी करणार आहेत.