‘ऑनलाईन’ गुन्हेगारांच्या टोळ्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जग अगदी छोटे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचेही नवनवे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये केवळ अशिक्षितच नव्हे, तर उच्चशिक्षितही फसत आहेत. असाच काहीसा प्रकार सातारा येथील कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावर असणार्‍या एका वसाहतीमध्ये घडला आहे. अमेरिकेतील उच्चशिक्षित नागरिकांना ऑनर्लाेन पद्धतीने फसवून ‘डॉलर’मध्ये पैसे उकळणार्‍या एका बनावट ‘कॉल सेंटर’चा सातारा पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सातारा आणि राजस्थान येथून १७ संशयितांना कह्यात घेतले आहे. ‘कॉल सेंटर’मधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य अमेरिकन नागरिकांचे संपर्क तपशील आणि २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आतापर्यंत भारतियांना विदेशी लोक फसवत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत, तसेच परराज्यातील लोक महाराष्ट्रातील नागरिकांना फसवत होते, हेही पाहिले. आता आपले लोक विदेशींना फसवत होते.

‘कॉल सेंटर’च्या माध्यमातून संशयित अमेरिकी नागरिकांना संपर्क करायचे आणि तुमच्या नावाने ‘ॲमेझॉन’वर खरेदी झाली आहे, असे सांगायचे. या वेळी संबंधित व्यक्तीने व्यवहार नाकारल्यास बनावट ऑर्डर (खरेदी) क्रमांक आणि संदेश पाठवून विश्वास निर्माण करायचे ! त्यानंतर ‘ऑर्डर’ रहित करण्यासाठी ‘गिफ्ट कार्ड’ घ्या किंवा ‘डिजिटल अरेस्ट’ची (खोटी ओळख दाखववून ऑनलाईन अटक केल्याचे भासवणे) भीती दाखवून पैसे उकळले जात होते. फसवणुकीसाठी प्रामुख्याने ‘डॉलर’मध्ये व्यवहारांचा उपयोग केला जात होता. या सर्व व्यवहारांमध्ये गुन्हेगारांची मानसिकता विचारात घेण्यासारखी आहे. केवळ पैसे कमावण्याची विद्या शिकवून नैतिक मूल्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आज सहस्रोंच्या संख्येने अशा ‘ऑनलाईन गुन्हेगारांच्या टोळ्या’ निर्माण झाल्या आहेत. भारताकडे संपर्ण विश्व मोठ्या आशेने पहात असतांना असे अपप्रकार होणे, हे भारतियांना लज्जास्पद आहे. नीतीमान समाज घडण्यासाठी धर्माचरणाची आवश्यकता आहे. पूर्वी भारतातील गुरुकुल शिक्षणपद्धतीत पारंपरिक आणि आधुनिक शिक्षण दिले जात होते; मात्र नंतरच्या काळात मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे देशाचे सर्व स्तरांवर वाटोळे झाले. आज सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी यांच्या टोळ्या निर्माण झाल्याचे िचत्र पहायला मिळत आहे. जागतिक पटलावर विज्ञानामध्ये क्रांतीकारक शोध लागत असले, तरी विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यानेच मनुष्य जीवन आनंदी होऊ शकते, हे संपूर्ण विश्वाला दाखवून देण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा