मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदी पत्रकारितेचा २०० वा वर्षपूर्ती सोहळा !

देवेंद्र फडणवीस

मुंबई – मातृभाषा आणि भारतीय भाषा यांद्वारे ज्ञान, संस्कृती अन् मूल्ये यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोचतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘मुंबई हिंदी पत्रकार संघा’च्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेसह इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे.’’