भारतातील मुसलमान औरंगजेबाची नव्हे, तर हिंदूंचीच संतान ! – रामदास आठवले, राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय विभाग

पालघर – मोगल भारतात येण्यापूर्वी येथील मुसलमान बांधव हिंदूच होते. मोगल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुसलमान हे औरंगजेबाची नाही, तर हिंदूंचीच संतान आहेत, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २७ मे या दिवशी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसलमानांनी बकरी ईदच्या निमित्ताने सोसायटीमध्ये कबर्‍या कापण्यासाठी आणल्याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि भाजप यांच्याकडून विरोध होत आहे. याविषयी पत्रकारांनी भूमिका विचारल्यावर रामदास आठवले यांनी अशा प्रकारे विरोध करणे चुकीचे असल्याचे म्हटले.

‘अडीच सहस्र वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र रहात होते. सध्या राजकीय लाभासाठी कुणीही धार्मिक भावना भडकावू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा अन्य कुणी. अशा पद्धतीने कुणालाही विरोध केला जाऊ नये’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • मुसलमान औरंगजेबाला आदर्श मानतात; म्हणूनच देशात असे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे ‘मुसलमान औरंगजेबाची संतान नाही’, हे रामदास आठवले यांनी मुसलमानांना सांगून त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे द्यावेत.
  • इमारतीत म्हणजेच ‘सार्वजनिक ठिकाणी प्राणीहत्या करू नये’, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्याचे पालन करायला सांगण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी प्राणीहत्येला सहमती दर्शवणे म्हणजे एकप्रकारे राज्यघटनेचाच अवमान होय !