Bhojshala : ७०० वर्षांनंतर शुक्रवारी भोजशाळेत नमाजपठण नाही, तर हिंदूंनी केली अखंड पूजा !

यापुढे शुक्रवारी नमाजपठण होणार नाही, तर केवळ पूजाच करता येणार !

धार (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी हिंदूंनी भोजशाळेत मोठी गर्दी केली. ७०० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. शुक्रवारी भोजशाळेत नमाजपठणाऐवजी केवळ ‘जय सियाराम’चा जयघोष घुमत होता. सकाळपासूनच तिथे हिंदु भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयात भोजशाळा परिसरातील मशिदीत नमाजपठणाची अनुमती रहित करण्यात आली होती. त्यामुळे मुसलमान येथे नमाजपठण करू शकले नाहीत.

हिंदूंकडून अखंड पूजा

निर्णयाच्या दुसर्‍या दिवसापासूनच भोजशाळेत हिंदू अखंड पूजा करत होते. २२ मेच्या सकाळपासूनच हिंदु बांधव भोजशाळा मंदिरात पोचून पूजा करत होते. त्याचबरोबर देवी वाग्देवीची आरतीही करण्यात आली. धारसह आसपासच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी आणि पूजेसाठी पोचत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार भोजशाळा परिसरात मंगळवारी हिंदु समाज पूजा करत असे, तर शुक्रवारी मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती होती.

भाजप आमदारही भोजशाळेत पोचले

आमदार नीना वर्मा यांनी भोजशाळेत पोचून श्री वाग्देवीच्या तैलचित्राचे दर्शन घेतले आणि पूजन केले. तसेच भोजशाळेशी संबंधित वयस्कर आंदोलक विमल गोधा यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांनी आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांनी भजन मंडळींसमवेत बसून भजन-कीर्तनातही सहभाग घेतला.