Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद गोरक्षणासाठी ‘गो-एल्एक्स’ नावाचे संकेतस्थळ चालू करणार !

संकेतस्थळावरून गायींची केली जाणार खरेदी-विक्री

वाराणसी (उत्तरप्रदेश) – द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी ‘गो-एल्एक्स’ नावाच्या एका संकेतस्थळाची निर्मिती  करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे गायींची खरेदी-विक्री केली जाईल.

गोरक्षक गायी विकत घेऊ शकतात !

शंकराचार्य म्हणाले की, जो पशुपालक किंवा व्यापारी गाय विकू इच्छितो, तो संकेतस्थळावर विज्ञापन देऊ शकतो. जर कोणताही हिंदू त्याची गाय विकू इच्छितो, तर त्याने मला विकावी. आम्ही गायी खरेदी करण्यास सिद्ध आहोत. आम्ही गायींना कापले जाऊ देणार नाही आणि कोणत्याही गोहत्यार्‍याला गाय खरेदी करू देणार नाही. आम्ही गायी विकत घेऊन त्यांची सेवा करू. गो संरक्षणासाठी समर्पित असलेले लोकही त्या गायी विकत घेऊन त्यांची सेवा करू शकतील.

संकेतस्थळ चालू करण्याचा उद्देश

गाय ऑनलाईन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण सांगतांना शंकराचार्यांनी म्हटले की, सामाजिक माध्यमे आणि काही वृत्तमाध्यमे यांद्वारे असा एक विचार पसरवला जात आहे की, जर मुसलमानांनी गायी खरेदी करणे बंद केले किंवा गोमांस खाणे सोडून दिले, तर हिंदु पशुपालक आर्थिक संकटात येतील. ज्या गायींनी दूध देणे बंद केले आहे किंवा ज्यांना कसाईला विकले जात आहे, अशा गायी आम्ही खरेदी करू. कोणताही खरा हिंदू स्वतःची गाय कापण्यासाठी विकू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीमध्ये खरे हिंदुत्व असेल, तर तो कधीही गायीला कसाईच्या हातात देणार नाही. ‘गो-एल्एक्स’ मंचाचा उद्देश कोणत्याही परिस्थितीत गायीला पशूवधगृहात जाण्यापासून रोखणे आहे. हे व्यासपीठ ‘ओएल्एक्स’च्या (ऑनलाईन साहित्य खरेदी-विक्री करणार्‍या संकेतस्थळाच्या) धर्तीवर कार्य करेल.

मुसलमानांकडून गोहत्या बंदीचे समर्थन

शंकराचार्यांनी सांगितले की, भारतात गोहत्या बंदीच्या समर्थनार्थ मुसलमान समाजही आहे. मुसलमान समाजातील अनेक लोक सोबत आहेत. मुसलमानांनी मान्य केले आहे की, ‘इस्लाममध्ये गोमांस खाणे, हे कोणतेही अनिवार्य धार्मिक कर्तव्य नाही.’ आम्ही अशा लोकांचे स्वागत करतो. जर देशात गोहत्या आणि गोमांस भक्षण बंद झाले, तर यामुळे सामाजिक सलोखा अन् आपापसातील सद्भावना यांना बळ मिळेल.

संपादकीय भूमिका

  • देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होत असल्यामुळे शंकराचार्यांना गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हे सरकारांना लज्जास्पद !
  • देशातून गोहत्या कायमची थांबवण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !