Bhojshala : भोजशाळेत हिंदूंकडून पूजा-अर्चा करण्यास प्रारंभ !

मोठ्या संख्यने भाविक घेत आहेत दर्शन !

धार (मध्यप्रदेश) – येथील भोजशाळा ‘कमाल मौला मशीद’ नसून हिंदूंचे श्री वाग्देवीचे मंदिर असल्याचा निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने दिल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून मोठ्या संख्येने हिंदू दर्शनासाठी येथे पोचत आहेत. त्यांनी येथे पूजा-अर्चा करण्यास प्रारंभ केला. १६ मेच्या सकाळी भाविक आणि भोज उत्सव समितीचे पदाधिकारी या परिसरात पोचले. यामध्ये संरक्षक विश्‍वास पांडे, भोजशाळा मुक्ती यज्ञाचे संयोजक गोपाल शर्मा, श्रीश दुबे, केशव शर्मा आणि अशोक जैन यांचा समावेश होता. सर्वांनी श्री वाग्देवीच्या स्थानाजवळ आणि यज्ञकुंडाजवळ फुले अर्पण करून दंडवत प्रणाम केला. भाविकांनी हनुमानचालिसाचे पठणही केले. सध्या संपूर्ण धार शहर आणि भोजशाळा परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून कडक लक्ष ठेवले जात आहे.

भोजशाळा मंदिर होते, आहे आणि राहील ! – भाविक

दर्शनानंतर भाविकांनी सांगितले की, अनेक वर्षांनंतर त्यांना कोणत्याही अडथळ्याविना पूजा करण्याची संधी मिळाली आहे.

भोजशाळा मुक्ती यज्ञाचे संयोजक गोपाल शर्मा म्हणाले, ‘‘भोजशाळेचा प्रत्येक कण हे दर्शवतो की, हे एक मंदिर आहे.’’ मुसलमान पक्षाच्या पुढील कायदेशीर कारवाईवर ते म्हणाले की, त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे; परंतु भोजशाळा मंदिर होते, मंदिर आहे आणि नेहमीच मंदिर राहील.

भोजशाळेच्या खांबांवर भगवान गणेशाची आकृती, तर भिंतींवर ‘ॐ नमः शिवाय ।’ दिसले !

‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे पत्रकारही येथे पोचले असता त्यांना भोजशाळेच्या परिसराच्या आत असलेल्या प्राचीन खांबांवर आणि भिंतींवर अनेक सनातन प्रतीके स्पष्टपणे दिसून आली. भोजशाळेत एकूण १०४ प्राचीन खांब आहेत, ज्यांवर विविध धार्मिक आकृती कोरलेल्या आहेत. यामध्ये भगवान गणेशाची आकृती, घंटा, रिद्धी-सिद्धी यांची आकृती आणि इतर पारंपरिक हिंदु चिन्हांचा समावेश आहे. अनेक खांबांवरील नक्षीकाम मंदिर स्थापत्यशैलीतील असल्याचे दिसून आले. भोजशाळेच्या भिंतींवर ‘ॐ नमः शिवाय ।’ आणि ‘ॐ सरस्वती नमः ।’ यांसारखे धार्मिक शब्दही स्पष्टपणे दिसले.

छतावर कमळाच्या फुलाची आकृती

छतावर कमळाच्या फुलाची आकृतीही आहे, जिला हिंदु धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. हिंदु पक्षाने सांगितले की, ही सर्व प्रतीके या गोष्टीचा पुरावा आहेत की, भोजशाळा मुळात माता सरस्वतीदेवीचे मंदिर होते.

चुना लावून चिन्हे झाकण्यात आली होती !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने न्यायालयात सादर केलेल्या त्याच्या अहवालात या प्रतीकांचा आणि आकृतींचा उल्लेख केला होता. परिसरातील अनेक चिन्हे पूर्वी चुन्याच्या थराने झाकली गेली होती. नंतर स्वच्छता आणि संवर्धन करतांना या आकृती अन् शिलालेख पुन्हा समोर आले. (सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी वेळ येताच ते जगासमोर येतेच, याचेच हे उदाहरण ! त्याच प्रमाणे हिंदु धर्मावर कितीही चिखलफेक केली, त्याला कितीही झाकोळण्याचा प्रयत्न जागतिक आर्थिक ‘डीप स्टेट’ने केला, तरी एक दिवशी त्याचे दैदीप्यमान तेज जगाला दीपवेलच. याखेरीज ‘डीप स्टेट’च्या नाशालाही ते कारणीभूत ठरेल, हे लक्षात घेतले पाहिजे ! यासाठी हिंदूंनो, साधना वाढवा ! – संपादक)