केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पहाणी !

पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मिता असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या मार्गाची बसने प्रवास करून प्रत्यक्ष पहाणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, गडकरी यांनी स्वत:च्या ताफ्यातील गाड्या ५० टक्क्यांनी न्यून करून राष्ट्रहिताचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. ‘आळंदी आणि देहूपासून निघणारी ही पालखी महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे’, असे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

या रस्त्यासाठी केंद्रशासन १२ सहस्र कोटी रुपये खर्च करत आहे. वारीमध्ये सहभागी होणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य रस्त्याव्यतिरिक्त साडेतीन मीटरची स्वतंत्र मार्गिका (लेन) आणि ‘सर्व्हिस रोड’ सिद्ध करण्यात आला आहे. या मार्गाचे सौंदर्य आणि पर्यावरण रक्षण यांसाठी ५० सहस्र वृक्षांची लागवड करण्यात आली असून ४५० प्राचीन वृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे.

आत्मनिर्भर भारताकडे पाऊल !

देशाच्या हितासाठी पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व अल्प करणे अनिवार्य असल्याचे गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केले. भारत आपली ८७ टक्के ऊर्जा आयात करतो, ज्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होते. येत्या काही दिवसांत १०० टक्के इथेनॉलवर चालणारी पहिली चारचाकी गाडी उपलब्ध केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी या वेळी दिली.

प्रलंबित कामे पूर्ण होणार !

वाखरी ते पंढरपूर या रेंगाळलेल्या ८२ कोटींच्या प्रकल्पाविषयी विचारणा केली असता, गडकरी यांनी हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या (NH) माध्यमातून वेगाने पूर्ण केला जाईल, असे सांगितले. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या ६ महिन्यांत संपूर्ण मार्ग पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः कठीण मानला जाणारा दिवेघाटाचा टप्पा यंदा वारकर्‍यांसाठी अधिक सुलभ आणि सुखकर ठरणार आहे.