Crime Against Women : भारतात प्रत्येक १८ मिनिटांना होतो एक बलात्कार !

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून प्रत्येक १८ मिनिटांना एका बलात्काराची नोंद होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

भारतात प्रतिवर्षी महिलांवरील अत्याचाराची अनुमाने ४ लाख ४५ सहस्र २५६ प्रकरणे नोंदवली जात आहेत. याचा अर्थ असा की, देशात प्रत्येक घंट्याला महिलांविरुद्ध अनुमाने ५१ गुन्हे घडत आहेत. बलात्काराच्या घटनांचा विचार करता प्रत्येक १८ मिनिटांनी एक महिला या क्रौर्याला बळी पडत आहे, म्हणजेच दिवसाला सरासरी १२७ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होत आहे.

महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर !

महिलांविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांच्या संख्येत उत्तरप्रदेश (६५ सहस्र ७४३ गुन्हे) पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र (४५ सहस्र ३३१ गुन्हे) दुसर्‍या आणि राजस्थान (४५ सहस्र ५८ गुन्हे) तिसर्‍या क्रमांकावर आहे.

दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण अल्प !

न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नाही. अनेक गुन्हेगार पुराव्यांअभावी किंवा प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेमुळे मोकळे सुटतात, असे तज्ञांचे मत आहे. सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून महिलांना लक्ष्य करण्याचे प्रमाणही गेल्या २ वर्षांत झपाट्याने वाढले आहे. या आकडेवारीमुळे महिला सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांची कार्यवाही आणि पोलिसांची कार्यक्षमता, यांविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संपादकीय भूमिका

यावर कठोर उपाययोजना केली जात नसल्याने भविष्यात प्रत्येक मिनिटाला अशी घटना घडू लागली, तर आश्चर्य वाटू नये !