‘नीट’ परीक्षा रहित झाल्याच्या मानसिक धक्क्याने गोव्यात कुडतरी येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

(नीट (NEET) ‘नॅशनल एलिजिबिलिट कम एंट्रन्स टेस्ट’, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा)

मडगाव, १३ मे (वार्ता.) – प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या कारणावरून ‘नीट-युजी २०२६’ परीक्षा रहित झाल्यानंतर मानसिक तणाव निर्माण झालेल्या नेसाय, कुडतरी येथील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत ‘मला पुन्हा परीक्षेला बसायचे नाही’, असे लिहिल्याचे आढळून आले आहे. हा विद्यार्थी मूळ बेंगळुरू येथील रहिवासी असून मडगाव परिसरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.

मृत विद्यार्थ्याचे वडील रेल्वेमध्ये गार्डच्या पदावर नोकरी करतात. घटनेच्या वेळी त्याची आई आणि बहीण मूळ गावी गेल्या होत्या. घरात कुणीही नसतांना ही घटना घडली. वडील कामावरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून या विद्यार्थ्याचा मृतदेह उत्तरीय पडताळणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचे अन्वेषण चालू आहे.

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

‘सध्या प्रतिदिन होणार्‍या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ आध्यात्मिक उपायांनी म्हणजेच साधनेने मात करता येते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. साधनेमुळे केवळ मनाची एकाग्रता साधते असे नाही, तर मनःशांतीही मिळते. प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे, या शाश्‍वत सत्याची जाणीव रहाते. एवढेच नव्हे तर जिद्द, चिकाटी यांसारखे गुण निर्माण होऊन ध्येयपूर्तीसाठी ईश्‍वरी अधिष्ठान लाभून यशप्राप्तीही होते. त्यामुळे साधना हेच सर्व प्रश्‍नावरील अंतिम उत्तर ठरते. त्यामुळे शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण, साधना इत्यादी गोष्टींचा समावेश असणे अत्यावश्यक ठरते. – संपादक