दौंड (पुणे) शहरातील ८ अनधिकृत पशूवधगृहे ३ दशकांच्या विलंबानंतर पाडली !

शासकीय जागेवरील पशूवधगृहांमध्ये प्रतिदिन राजरोसपणे गोहत्या !

पुणे – दौंड शहरातील खाटीक गल्ली, कसाई मोहल्ला आणि भीमा नदीकाठच्या ईदगाह मैदान या परिसरातील ८ अनधिकृत पशूवधगृहे ३ दशकांच्या विलंबानंतर ११ मे या दिवशी भुईसपाट करण्यात आली आहेत. शासकीय जागेवरील या पशूवधगृहांमध्ये राजरोसपणे गोहत्या केली जात होती. भीमा नदीच्या पूररेषेत शासकीय जागेवर ही पशूवधगृहे बांधण्यात आली होती. दौंड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाकडील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कारवाईच्या वेळी तैनात करण्यात आला होता.

गोरक्षकांनी वेळोवेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार दौंड पोलिसांनी या अवैध पशूवधगृहांवर धाडी घालून गोमांस जप्त करण्यासह संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवलेले आहेत; परंतु दौंड नगरपालिका प्रशासन या पशूवधगृहांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. (अशा दोषी आणि कर्तव्यशून्य अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी ! – संपादक) या पशूवधगृहांमधून अनिर्बंधपणे प्रतिदिन गोहत्या केली जात असून गोमांसाची मुंबई, पुणे आणि अन्य भागांत वाहतूक केली जात आहे. दौंड शहर आणि परिसरातील अवैध पशूवधगृहे, चमड्याचे गोदाम, गोमांस विक्री अन् साठा करण्यासाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड तातडीने हटवण्याची मागणी प्रलंबित होती.

गोमांसाचे अवशेष आणि रक्ताची भीमा नदीपात्रात लावली जात होती विल्हेवाट !

गोहत्या केल्यानंतर गायीचे रक्त आणि अनावश्यक मांस यांची परिसरात अन् भीमा नदी पात्रात विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण यांचा गंभीर प्रश्न उभा राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने कारवाईसाठी पुढाकार घेतला. दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार आणि दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. (पवित्र भीमा नदीच्या पात्रात गोमांसाचे अवशेष आणि रक्त सोडले जाणे, हा केवळ पर्यावरणाचा र्‍हास नसून हिंदूंच्या धार्मिक भावना अन् श्रद्धा यांचा अपमान आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नगरपालिका यांनी इतकी वर्षे याकडे दुर्लक्ष का केले ? पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांना विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी आता या प्रदूषणाविषयी गप्प का आहेत ? – संपादक)

गोहत्या करणारी धर्मांधांची टोळी सीमापार !

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी २३ मार्च या दिवशी दौंड परिसरात गोहत्या करणार्‍या टोळीचा सदस्य हसन उपाख्य लड्डू लाला कुरेशी, जमिल कुरेशी आणि फैजान कुरेशी यांना २ वर्षांकरता सीमापार (हद्दपार) केले आहे. गोहत्या करून गोमांसाची वाहतूक आणि विक्री करणार्‍या टोळीतील या तिघांना पुणे ग्रामीण पोलीस सीमेतील दौंड, बारामती, हवेली अन् इंदापूर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका येथून सीमापार करण्यात आले आहे. (ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांना अन्य ठिकाणी गुन्हे करण्याची मोकळीकच ! अशा शिक्षेने गोवंशहत्या रोखली जाईल का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • प्रशासनाचे डोळे उघडायला ३० वर्षे का लागली ? पशूवधगृहे अनधिकृत असतांनाही त्यांवर कारवाई का झाली नाही ?
  • राज्यात ‘गोवंश हत्याबंदी’ कायदा लागू असूनही शासकीय जागेवर ३० वर्षे पशूवधगृहे चालतात, हे सरकारी यंत्रणांचे मोठे अपयश आहे !