सावंतवाडीत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस

  • आंबा, काजू आदी फळबागांची हानी

  • अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार आणि व्यापारी चिंतेत

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडला. ७ मे या दिवशीही असाच पाऊस पडला होता. ८ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. या अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा, काजू आणि हंगामी फळबागांची मोठी हानी झाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे काढणीला आलेला आंबा आणि बागेतील तयार फळे खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने बागायतदार आणि व्यापारी चिंतेत आहेत. यासह जांभूळ, फणस, कोकम यांसारख्या हंगामी पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

प्रलंबित कामांमुळे रस्त्यांवर चिखल

सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे. यामुळे रस्ते निसरडे झाले असून वाहनचालकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.

वेत्ये येथे माडावर पडली वीज

अनेक ठिकाणी वादळी वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या पडल्या. वेत्ये येथे एका माडावर वीज पडल्याने माडाने पेट घेतला. यात माड जळून राख झाल्याने संबंधित शेतकर्‍याची हानी झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.