‘कॉपीमुक्त मोहिमे’मुळे यंदा इयत्ता १२ वीच्या निकालात २.०९ टक्के घट !

परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के लागला !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८९.७९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. मागील वर्षी हा निकाल ९१.८८ टक्के होता. यंदा परीक्षेत ‘कॉपीमुक्त मोहिमे’ची काटेकोर कार्यवाही करण्यात आल्याने निकालात घट झाली, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परीक्षेच्या काळात १५ गुन्हे नोंदवण्यात आले, तर १०० कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. राज्यभरात एकूण १ सहस्र ९८३ गैरप्रकार समोर आले. त्यात २३७ कॉपी आणि १ सहस्र ४६९ सामुदायिक कॉपी प्रकरणांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यांचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रांवरील व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आल्याने पारदर्शकता वाढली.

यंदाही मुलींनीच निकालात मारली बाजी !

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.२५ टक्के असून मुलांची टक्केवारी ८६.८ टक्के आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

संपादकीय भूमिका

कॉपीमुक्त मोहिमेची फलनिष्पत्ती ही निकालात झालेली घट पाहून नव्हे, तर ती किती टक्के यशस्वी झाली, यावरून निश्‍चित होऊ शकते. शिक्षण मंडळ हे सांगेल का ? यासमवेतच मोहीम १०० टक्के यशस्वी झाली, तर किती टक्के निकाल लागेल, हेही मंडळाने जनतेसमोर आणले पाहिजे.