‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकावर बंदी घाला आणि कॉ. पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर गुन्हा नोंदवा

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कॉ. पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर गुन्हा नोंदवा संजय गायकवाड यांची मागणी

बुलढाणा – कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकातील वादग्रस्त विधानांवरून येथील शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी येथील जिल्हाधिकार्‍यांकडे २७ एप्रिल या दिवशी निवेदन सादर केले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिणार्‍या कॉ. पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर गुन्हा नोंदवा, तसेच महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी आणि लेखकाच्या मृत्यूनंतर पुस्तक छपाई करणारे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अटक करा’, अशा मागण्या त्यांनी या निवेदनात केल्या.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 

१. छत्रपती शिवराय महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाचा वापर करून काही लेखक आणि प्रकाशक आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतात.

२. या पुस्तकाद्वारे महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोचवण्याचा प्रयत्न होत आहे.

३. पुस्तकास विदेशातून आर्थिक साहाय्य मिळाले आहे का ? याची चौकशी करावी, तसेच पुस्तक छापणार्‍या आणि त्याची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी.


प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याने आंदोलन रहित

बुलढाणा –  ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन पुस्तकाचे वाचन करणार होते; मात्र त्यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी चिखली येथे प्रशांत आंबी यांना कह्यात घेऊन जिल्ह्याच्या हद्दीत स्थानबद्ध केले. दुपारनंतर त्यांना सोडून दिण्यात आले. त्यांनी बुलढाण्यात प्रवेश करताच ही कारवाई केली. सध्या त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे.

आंबी यांच्यासमवेत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आणि विविध जिल्ह्यांतून आलेले ५०० पेक्षा अधिक पुरोगामी कार्यकर्ते या वेळी उपस्थित रहाणार होते आणि शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात मोर्चा काढला जाणार होता. पोलिसांनी आंबी यांना स्थानबद्ध करून कारवाईला आरंभ केला.

या पुस्तकप्रश्नी आयोजित केलेल्या सभेचा मंडप ठेकेदाराला काढायला लावण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचे जारसुद्धा परत नेण्यात आले आहेत.

शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तर दायित्व आमचे नाही ! – संजय गायकवाड यांची चेतावणी

वरील घटनेच्या संदर्भात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गर्भित चेतावणी देत सांगितले की, या पुस्तकात ३०० हून अधिक वेळा ‘शिवाजी’ असे लिहिले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी ‘महाराज’ असे म्हणावे. जर आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आणि शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तर याचे सगळे दायित्व त्या पुस्तक वाचनाच्या आयोजकाचे आणि पुस्तक वाचणार्‍याचे असेल.

या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही या वेळी संजय गायकवाड यांनी केली.

संपादकीय भूमिका

कॉ. पानसरे यांच्या एकूणच सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी पोलीस करतील का ?