Karnataka Janeu Controversy : कर्नाटकात परीक्षा केंद्रातील कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्याचे जानवे कापून कचर्‍याच्या डब्यात फेकले !

८ दिवसांपूर्वी झाली होती विद्यार्थ्याची मुंज !

प्रातिनिधिक छायाचित्र

चिक्कबळ्ळापूर (कर्नाटक) – येथील नागार्जुन महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ अर्थात् ‘सीईटी’च्या (‘कॉमन एन्ट्रन्स टेस्ट’च्या)  वेळी विद्यार्थ्यांना त्यांचे जानवे, तर विद्यार्थिंनींना यांच्या नाकातील चमकी काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. याविषयी आता सुप्रिथ के.आर्. या विद्यार्थ्याने त्याच्यासमवेत घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणाला की, २३ एप्रिलला सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मी परीक्षा केंद्रावर पोचलो. आत जाण्यापूर्वी तेथील कर्मचार्‍यांनी माझी पडताळणी केली, तेव्हा मी जानवे घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मी स्वतः जानवे काढण्याची सिद्धता दर्शवूनही कर्मचार्‍यांनी स्वतःच ते कात्रीने कापून कचर्‍याच्या डब्यात फेकून दिले. या घटनेमुळे मला तीव्र मानसिक धक्का बसला. अवघ्या ८ दिवसांपूर्वीच माझा उपनयन संस्कार विधी (मुंज) झाला होता. परीक्षा संपल्यानंतर मी स्वतः कचर्‍याच्या डब्यातून माझे जानवे शोधून काढले आणि घरी घेऊन गेलो.

अधिकार्‍याने आरोप फेटाळले !

परीक्षा केंद्राचे गणवेश संहिता अधिकारी दोड्डा ईरप्पा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. केंद्रावर कर्नाटक परीक्षा विभागाकडून नियमांनुसारच विद्यार्थ्याची पडताळणी करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचे जानवे आम्ही काढायला सांगितलेले नाही, कापलेले नाही किंवा फेकलेले नाही. तरीही हा विद्यार्थी असा आरोप का करत आहे ?, हे मला ठाऊक नाही.

आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव संतप्त !

सीईटी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचे जानवे कापल्याच्या घटनेविषयी आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करत मंत्री म्हणाले, ‘‘कृपानिधी महाविद्यालयात सीईटी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे जानवे काढल्याची घटना माझ्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी आधीच तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली असून पोलीस याचे अन्वेषण करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे कारवाई केली जाईल. विद्यार्थी आणि पालक यांनी चिंता करू नये.’’

मंत्री गुंडुराव पुढे म्हणाले,

१. सीईटी परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थिनींच्या कानातले, हातातील बांगड्या, तसेच मुलांचे जानवे काढणे, तसेच लांब बाह्या कापणे यांसारख्या कृतीतून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा अमानवीय प्रकार अक्षम्य आणि निंदनीय आहे. परीक्षा केंद्रे ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कसोटी पहाणारी ठिकाणे असली पाहिजेत. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवणारी केंद्रे असू नयेत.

२. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकार अत्यंत गंभीर पावले उचलेल. या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. त्यांनी परीक्षेसाठी चांगली सिद्धता करावी आणि जीवनातील यशाच्या दिशेने निष्ठेने अन् निश्‍चिंतपणे वाटचाल करावी. आमचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. धैर्याने परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकाचे काँग्रेस सरकार म्हणजे रझाकार अथवा मोगल यांच्यासारखेच सरकार आहे, असेच अशा घटना दर्शवतात ! त्यांच्या विरोधात आता हिंदूंनी रस्त्यावर उतरून वैध मार्गाने सरकारला धडा शिकवला पाहिजे !
  • सरकारी कर्मचारी कधी मुसलमान विद्यार्थ्यांची गोल टोपी अथवा ख्रिस्ती विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ‘क्रॉस’ कापण्याचा विचारतरी करू शकतात का ? हे हिंदूंनी लक्षात घेऊन तसा वचक निर्माण केला पाहिजे !