मराठी अनिवार्य करण्यावरून मुंबईत अमराठी आणि मनसैनिक यांच्यात वाद !

संजय निरूपम यांनी अमराठी चालकांसमवेत संवाद साधला

मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रात रिक्शा, टॅक्सी, ओला, उबेर आदी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याविषयी शिवसेनेचे नेते संजय निरूपम हे २४ एप्रिल या दिवशी दहिसर लिंक रोड येथे अमराठी चालकांसमवेत संवाद साधणार होते. या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आले. त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. या वेळी मनसेचे कार्यकर्ते आणि अमराठी चालक यांच्यामध्ये वाद झाला.

येथे मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी संजय निरूपम माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले, ‘‘शासनाने मराठीची सक्ती करू नये आणि अमराठी चालकांनीही शासनाची भूमिका समजून घ्यावी.’’ मनसेचे कार्यकर्ते माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले, ‘‘अमराठी चालक २०-२५ वर्षांपासून मुंबईमध्ये रहात असूनही मराठी का बोलत नाहीत. शासनाचा निर्णय स्पष्ट असतांना संजय निरूपम अमराठी लोकांना भडकवत आहेत.’’

संपादकीय भूमिका

मराठी भाषा शिकण्यासाठी सर्वपक्षीय हिंदी भाषिक नेते आवाहन का करत नाहीत ? महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणे हे वादाचे सूत्र होत असेल, तर याविषयी हिंदी भाषिकांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.