नदी सुशोभिकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर ! – पंकजा मुंडे, पर्यावरणमंत्री

बैठकीला संबोधित करतांना मंत्री पंकजा मुंडे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी

पुणे – नदी सुशोभिकरणापेक्षा नदीच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी कार्यवाही करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन कामासाठी समर्पित असे स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ची पहाणी करतांना मंत्री पंकजा मुंडे आणि अन्य मान्यवर

मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, अनेक उद्योगांमध्ये ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एस्.टी.पी.) उभारले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद असतात. यापुढे अशा उद्योगांवर केवळ नोटीस न बजावता थेट आणि कठोर कारवाई केली जाईल.

तळवडे आणि पवना नदीवरील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ची पहाणी !

मंत्री पंकजा मुंडे यांनी इंद्रायणी नदीवरील तळवडे आणि पवना नदीवरील रावेत येथील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ची (नैसर्गिक स्रोतांमधून (नद्या, तलाव, जलाशय किंवा विहिरी यांमधून) प्रक्रिया न केलेले पाणी काढून ते प्रक्रिया केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी केलेली व्यवस्था) पहाणी केली, तसेच नद्यांच्या प्रदूषण सद्यस्थितीची प्रत्यक्ष पहाणी केली. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावर ठोस पावले उचलली जात असून नदी स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नाहीत, तर नागरिकांचे सहकार्य अन् औद्योगिक नियमांचे काटेकोर पालनही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्या या वेळी म्हणाल्या. मंत्री पंकजा मुंडे यांनी इंद्रायणी नदीपात्रातील फेस, सांडपाणी आणि वाढती जलपर्णी या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी निर्देश दिले.

संपादकीय भूमिका

नदी प्रदूषणाच्या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्यातील भ्रष्टता आणि निष्क्रीयता काढून टाकल्यास नद्या शुद्ध होतील !