‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सावरकर यांना सरकारने दिलेली नाही ! – सात्यकी सावरकर यांचे मत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण

सात्यकी सावरकर

पुणे- ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सावरकर यांना सरकारने दिलेली नाही. ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी प्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी स्वत:च्या चरित्रग्रंथात वापरली होती. रानडे यांनी ही पदवी स्वतःच्या कल्पनेतून आणि आवडीतून दिली होती. ही पदवी जनतेकडून लोकप्रिय झाली असावी. यामागे कोणतीही सरकारी किंवा संस्थात्मक संमती होती कि नाही, हे मला ठाऊक नाही, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात सांगितले. पुणे विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी खटल्याची सुनावणी झाली. उलटतपासणीत अधिवक्ता मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना सात्यकी यांनी हे सगळे खुलासे केले. सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी १३ एप्रिलला पुढे चालू राहील.

१. सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या तक्रारीत पुरावा म्हणून अनेक वृत्तपत्रीय अहवाल आणि राहुल गांधींच्या लंडनमधील भाषणाच्या व्हिडिओची एक यू ट्यूब लिंक सादर केली आहे.

२. त्यांनी तक्रारीत म्हटले की, राहुल गांधींनी सावरकर यांच्यावर खोटा आरोप केला की, त्यांनी एका मुसलमान व्यक्तीला मारहाण केल्याचे वर्णन करणारे पुस्तक लिहिले आहे. वास्तविक असे पुस्तक सावरकरांनी कधीही लिहिलेले नाही आणि अशी कोणतीही घटना कधीही घडली नाही.

३. राहुल गांधी यांनी सावरकर यांना अपकीर्त करण्याच्या आणि त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याच्या विशिष्ट उद्देशाने हे खोटे, द्वेषपूर्ण आणि निराधार आरोप केले होते.

४. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

५. त्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांना मानहानीविषयी अधिकाधिक शिक्षा आणि हानीभरपाई देण्याची मागणी न्यायालयात केली आहे.